हिंगोली : मराठा समाजाबाबतची मंत्री छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्यं दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे, भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी घेतली होती. दरम्यान, आता वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली असून, उद्या होणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी सभेला (OBC Sabha) भुजबळांसोबत हजेरी लावणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, तसेच सर्व ओबीसी नेत्यांची देखील अशीच भावना आहे. त्यामुळे, उद्याच्या ओबीसी सभेला आपण उपस्थित राहणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 


दरम्यान, याबाबत बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, "हिंगोली येथील ओबीसी मेळाव्याची आधीपासूनच तयारी करण्यात आली होती. सगळ्या ओबीसी बांधवांनी ही तयारी केली होती. तर, गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, ओबीसी नेत्यांची सुद्धा अशीच भावना आहे. त्यामुळे आपण हिंगोलीच्या मेळाव्याला जाणार आहे. हा मेळावा सर्वपक्षीय मेळावा आहे. ओबीसीसाठी भुजबळ साहेबांनी सुद्धा आवश्यकता पडेल तर राजीनामा देण्यासाठी तयार असल्याची भूमिका मांडली आहे. तसेच, ओबीसीच्या हक्कासाठी भेद नको असं म्हणणारे नेते मला भेटले आहे. त्यामुळे, आमच्या भूमिकेमुळे चुकीचा संदेश जाऊ नये आणि ओबीसींच्या आग्रहाखातर मी हिंगोली येथे उद्याच्या मेळाव्याला जातोय," असे वडेट्टीवार म्हणाले. 


सरकारमध्ये एकमेकांची जिरवा असा उद्योग सुरु...


सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही. एक मंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देतो. सरकारमध्ये तिघांचीही दिशा वेगवेगळी आहे. दिल्लीच्या हाय कमांडला तिघांना एकत्र बसून समजवण्याची वेळ येते. जसं पाणी अडवा जिरवा आहे तसं एकमेकांच्या फाईली अडवा आणि एकमेकांची जिरवा असा उद्योग सर्रास या सरकारमध्ये सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 


पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक 


दरम्यान, जालना येथील आंतरवाली सराटी प्रकरणावर बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, "पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांच्या आदेशशिवाय लाठीमार होणे शक्य नव्हते. त्यांच्यावर कारवाई आवश्यक आहे. फक्त ओबीसी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली व इतरांवर झाली नसल्याचा चुकीचा संदेश जाईल,” असे ही वडेट्टीवार म्हणाले.


दोन्ही फुटीरवाद्यांना कमळ हाती घ्यावे लागणार...


भाजपला 2019 मध्ये 22 टक्के मत मिळाली. आता आमच्याकडे जो काही सर्व्हे आहे त्यात 17 ते 18 टक्केपेक्षा जास्त मतं भाजपला मिळणार नाही. तसेच शिंदे गट आणि अजित पवार गट या दोन्ही फुटीरवाद्यांना जे काही चिन्ह मिळेल त्यावर लढण्याची त्यांची क्षमता नाही. त्यामुळे त्यांनाही कमळ हाती घ्यावा लागेल, असे वडेट्टीवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


OBC Sabha : हिंगोलीतील ओबीसी सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट; कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी घेतला महत्वाचा निर्णय