Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहे. सत्तेसाठी ते ओवेसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही निर्णयाने राज्यातील लोकांच्या सरकारला फरक पडणार नाही. मात्र त्यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा काही फायदाही त्यांना होणार नसून ते भीमसेना (भीम शक्ती) नव्हे तर फक्त एक गट असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. स्वतः उद्धव ठाकरेंसोबतचे कार्यकर्तेही ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे नाराज आहे. त्यामुळे त्यांचे अनेक कार्यकर्ते येत्या काळात ठाकरेंची साथ सोडणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.


राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, आम्ही लढत असलेल्या चारही जागा आम्ही जिंकू, कोकणात आम्ही मुसंडी मारली आहे. तर मराठवाडा, अमरावती आणि नागपूर येथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकची जागा अपक्ष उमेदवारांची आहे. नाशिकबद्दल पक्षस्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच कॉंग्रेसमधून निलंबित सत्यजित तांबे  यांनी भाजपकडे अजूनही समर्थन मागितलेले नसल्याचेही यावेळी बावनकुळे यांनी स्पष्ट केले.


भाजपची साथ सोडल्यापासून उद्धव ठाकरेंच्या अधःपतनाला सुरुवात...


उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली त्याचवेळी त्यांचे अधःपतन झाले. बाळासाहेबांच्या नावाने मते घेतली,मात्र अडीच वर्षात तैलचित्र लावलं नाही,त्यांची संकुचित वृत्ती आहे अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.  शिवसेनेची स्थापना करताना बाळासाहेबांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. बाळासाहेबांनी त्याचवेळी सांगितलं होतं मी पक्षाला कुलूप लावेल. पण काँग्रेस सोबत जाणार नाही. काँग्रेसकडून वारंवार सावरकर यांचा अपमान करण्यात येत आहे. मात्र उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करणाऱ्या सोबत जाऊन बसले. अडीच वर्ष तुम्ही सत्तेचा उपभोगही घेतला, असेही ते म्हणाले.


काल विधीमंडळात यायला हवे होते


विधानभवनातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा काल पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त हे तैलचित्र लावण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे प्रमुख राज ठाकरे, अॅड. निहार ठाकरे, स्मिता ठाकरे, चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आदी उपस्थित होते. बाळासाहेब यांचे पुत्र उद्धव ठाकरे, सून रश्मी ठाकरे, नातू आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी मात्र  या सोहळ्याला उपस्थिती लावण्याचं टाळले. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, स्वतः सत्ता भोगत असताना उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तैलचित्र लावला नाही. त्यांनी फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भावनिक  साद घालून मते मिळविली. त्यांनी काल विधीमंडळात यायला हवे होते. त्यांनी संकुचित वृत्ती दर्शविली असल्याची टीकाही यावेळी बावनकुळे यांनी केली.


ही बातमी देखील वाचा...


Badshah : बादशाहला कोर्टाचे अल्टीमेटम ; 7 फेब्रुवारीपर्यंत नागपूरच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश