नागपूर : नागपूरमध्ये आजपासून दोन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरकर ही या जनता कर्फ्युला योग्य प्रतिसाद देत असून सकाळच्या सत्रात तरी रस्त्यांवर कमी गर्दी दिसत असून फार कमी संख्येत लोकं घरा बाहेर निघाल्याचे दिसून येत आहे


उपराजधानी नागपूर मध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवसीय जनता कर्फ्युला सुरुवात झाली आहे. काल महापौर, महापालिका आयुक्त आणि सर्वपक्षीय आमदार यांच्यात झालेल्या बैठकीत दोन दिवसीय जनता कर्फ्युचे आयोजन करून नागरिकांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबद्दल गांभीर्य निर्माण करण्याचे ठरवण्यात आले होते. त्याच प्रमाणे आज सकाळपासून जनता कर्फ्युची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

फक्त दूध पुरवठा, कचरा संकलन, पाणी पुरवठा, औषध व रुग्णालयीन सेवा अशा मोजक्या अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व प्रतिष्ठान 2 दिवस बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी काढले आहे. शहरात 60 ठिकाणी पोलिसांनी मोठी नाकाबंदी केली असून 2300 कर्मचारी, 350 अधिकारी यांच्यासह 350 होमगार्ड असे 3 हजार अधिकारी कर्मचारी जनता कर्फ्युच्या बंदोबस्तात लावण्यात आले आहे. सातत्याने पोलिसांचे वाहन शहरात फिरून जनता कर्फ्युचे पालन करा, असे आवाहन करताना दिसून येत आहे.

दरम्यान, नागपूरच्या वेगवेगळ्या बजारपेठामध्ये महापालिका आणि विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक पायी फिरून दुकाने बंद ठेवा, घराबाहेर निघालेल्या नागरिकांनी घरी परतावे असे आवाहन करत आहेत. असे 30 पथक शहरातील वेगवेगळ्या भागात फिरत आहेत.

दरम्यान, या दोन दिवसीय जनता कर्फ्युमध्ये नागपूरकर कसा गांभीर्य आणि अनुशासन दाखवतात यावर पुढे शहरात लॉकडाउन करावे का आणि आवश्यक असल्यास किती दिवसांचे लॉकडाउन करावे याचक निर्णय होणार आहे. 31 जुलै रोजी प्रशासनाने त्यासंदर्भात बैठक बोलावली आहे. त्यामुळे जनता कर्फ्युमध्ये नागपूरकराचा योग्य प्रतिसाद अत्यंत महत्वाचा आहे.