नागपूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एका कार्यक्रमात मारवाडी समाजाबाबत गौरवोद्गार काढले. नागपुरात मारवाडी फाऊंडेशनद्वारे दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते.


मारवाडी समाज एकेकाळी गरिबांची पिळवणूक करणारा म्हणून ओळखला जायचा. मात्र आता ते बाबासाहेबांच्या नावाने पुरस्कार देत आहेत, ही सकारात्मक बाब असल्याचं शिंदे म्हणाले. यावेळी शिंदे यांच्या हस्ते यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कारांने सन्मानित करण्यात आलं.

मारवाडी समाज एक लोटा आणि एक पंचा घेऊन मारवाडमधून आला. मात्र मेहनत आणि नशिबाच्या जोरावर त्यांनी पैसा कमावला. आज तेच मारवाडी समाज बाबासाहेबांच्या नावाने पुरस्कार देत आहे. हे सकारात्मक चिन्हे असल्याचे मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

सध्या बाबासाहेबांचे विचार संपवण्याचे प्रयत्न होत आहे. त्यामुळे अनुसूचीत समाजाने सावध राहण्याची गरज असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. एखादे राजकीय लाभ घेण्यासाठी, एखादी सीट मिळवण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांची तडजोड करणे योग्य नाही असेही शिंदे म्हणाले.