नागपूर : सर्वच जाती-धर्माच्या व्यक्ती आज आरक्षण मागत आहेत. सर्वांना आरक्षण दिल्यावरही 90 टक्के युवकांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात आयोजित जागतिक मराठी संमेलनात रामदास फुटाणेंनी घेतलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी उत्तर दिलं.


सर्व जातीच्या व्यक्ती मागत असलेलं आरक्षण दिल्यावरही त्यातील 90 टक्के युवकांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत. हळूहळू सर्वांना समजेल की आपण आरक्षण मिळवलं, तरी सरकारी नोकऱ्या मिळतीलच असं नाही. ही गोष्ट कोणीतरी परखडपणे सांगायची वेळ आल्याचं फडणवीस म्हणाले.

मराठी माणूस देशाचा पंतप्रधान कधी होणार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता 2050 पर्यंत देशाला एक नव्हे तर अनेक मराठी पंतप्रधान मिळतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

आपल्याला हव्या त्या वेगाने सिस्टम बदलत नाही. सुरुवातीला खूप त्रास झाला, मात्र आता प्रशासनावरील पकड  वाढली आहे आणि पेशन्सही वाढला आहे, त्यामुळे त्रास कमी झाला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

50 टक्के प्रशासकीय अधिकाऱ्यांना खरंच काम करायचं आहे, मात्र 50 टक्के फक्त वेळ काढत आहेत, असं निरीक्षणही देवेंद्र फडणवीसांनी नोंदवलं. 'मला लक्षात आलं की प्रशासन तुम्हाला जोखत असतं. एकदा लोकांना कळलं की ह्यांना आपण मूर्ख बनवू शकत नाही, की मग ते कामाला लागतात' असंही फडणवीस मिष्किलपणे म्हणाले.