मुंबई: उद्धव ठाकरे यांनी वर्षा सोडलं त्याच्या पाच मिनिटं आधी मी गुवाहाटीला निघालो, आम्ही गद्दार नाही, ही लढाई अस्मितेची आहे असं आमदार आशिष जयस्वाल म्हणाले. आ. आशिष जयस्वाल यांनी एबीपी माझाला Exclusive मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. उद्धव ठाकरेंची शेवटपर्यंत मनधरणी केली, पण त्यांनी ऐकलं नाही असंही ते म्हणाले. ज्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करुन गुवाहाटी गाठली, त्यामधील ते शेवटचे आमदार आहेत. 


आमदार आशिष जयस्वाल यांनी या मुलाखतील अनेक गौप्यस्फोट केलेत. ते गुवाहाटीला का गेले अन् गुवाहाटीतील सर्व घडामोडींचे साक्षीदार कसे झाले याबद्दल आशिष जयस्वाल यांनी माहिती दिली. 


गुवाहाटीला सगळ्यात शेवटी का पोहोचला?
गुवाहाटीला सर्वात शेवटी का पोहोचलो याविषयी सांगताना आमदार आशिष जयस्वाल म्हणाले की, "खरं तर मी सगळ्यात आधी 20 तारखेलाच निघालो होतो. पण उद्धव ठाकरेंना कळले, त्यांचा फोन आला. त्यांनी कुठे आहे असं विचारल्यानंतर मी एअरपोर्टला असल्याचं सांगितलं. त्यावर त्यांनी परत बोलवलं. माझ्याबरोबर इतर सात ते आठ आमदार होते, आम्ही सगळे परत गेलो. दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण मग ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांना पदावरून काढण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा मी उभा राहिलो. नम्रपणे परत म्हणणं मांडलं. आम्ही सर्व आगीवर पाणी ओतत होतो, पण काही लोक आगीत पेट्रोल ओतत होते."


राऊत, परब, देसाई... आगीमध्ये तेल ओतणारे, ठाकरेंच्या भोवतीचे कोंढाळे
गेली अडीच वर्षे आमच्यात खूप रोष होता, खूप त्रास झाला. आम्ही सहन केले, साहेबांना मुख्यमंत्री राहायचे होते म्हणून आम्ही अडीच वर्षे गप्प राहिलो, अभद्र युती सहन केली. गुवाहाटीला जाण्याचा निर्णय सामूहिक होता. मी 20-25 वर्षांपासून पाहतोय, जे निवडून येत नाही, ते शिवसेना चालवतात. निलम गोऱ्हे, संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई हे निवडून आलेल्या आमदारांना 'डिक्टेट' करतात. 


...नाहीतर संजय राऊत यांना पाडलं असतं
आमच्या मनात पाप असते, कपट असते, गद्दार असतो तर संजय राऊत यांना निवडून दिले असते का? राज्यसभेत पाडले असते. कोणाला इच्छा नव्हती त्यांना मत द्यायची. पण शेवटी पार्टीचे उपकार फेडायचे म्हणून संजय राऊत यांना आम्ही निवडून दिले, आमच्या पैकी काहींनी भाजपला मतं दिली पण  शिवसेनेला पाडून नाही. 


आम्ही गद्दार कसे?
आम्ही गद्दार, बेईमान कसे? कशी व्याख्या करता? ही गद्दारी नाही, ही अस्मितेची लढाई आहे. उद्धवजींनी वर्षा सोडलं, त्याच्या पाच मिनिटं आधी मी गुवाहाटीसाठी निघालो होतो, ते चित्र पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले, खरंच सांगतो. 


शिवसेनेच्या आमदारांना त्रास होतोय, आमच्याकडे मंत्री कमिशन मागतात या मुद्द्यांवर मी पत्रकार परिषद घेतली. त्याची राज्याता एवढी मोठी बातमी झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मी सलग तीन दिवस भेटलो, त्यांनी याची साधी चौकशीही केली नाही. 


बंडखोर आमदार सुरतला गेल्यावर म्हणणे माना असं आम्ह समजावत असताना उद्धव ठाकरे मात्र हेच म्हणत होते की ज्यांनी माझ्या कुटुंबावर आरोप केला, त्यांच्याबरोबर मी युती करणार नाही. आम्ही त्यांना समजावलं, यातून मार्ग निघेल अशी आशा होती. कारण आज आम्ही छगन भुजबळ यांच्यासोबत बसतो, त्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. मग हा दुटप्पीपणा का?  


2019 ला शरद पवारांनी आग्रह धरला की उद्धवजींनी मुख्यमंत्री व्हावे. आम्ही सांगणार आहे का राष्ट्रवादीने कोणाला उपमुख्यमंत्री करावे? शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही सत्तेत 5 ते 10 टक्केच वाटा होता. जेव्हा त्यांचीच सरकार होती, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलने तरी करू शकत होतो, आता ते ही करू शकत नव्हतो.


आजही त्यांच्याकडे जे आमदार आहेत, त्यापैकी फक्त पाचच त्यांचे आहेत. बाकी एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. 


एकनाथ शिंदेच का?
आमदार कुठे दिसत होते? ज्या डॉक्टरकडे आराम मिळेल त्या ठिकाणी पेशंट जातात. दीपक सावंत, अनिल परब यांच्याकडे कोण जात होते. कारण आमदारांना काय हवंय? प्रेम, कामे, मतदार संघाचे प्रश्न सोडवणे. हे ते करत नव्हते. या गोष्टी एकनाथ शिंदे करत होते. आम्ही जर पाच वर्ष हे सहन केले असते तर शिवसेना संपली असती. 


मी आणि देवेंद्र फडणवीस मित्र आहोत. मला अभिमान आहे, की एक हुशार अष्टपैलू व्यक्ती माझा मित्र आहे. माझ्यात आणि त्यांच्यात कधी पार्टी आली नाही. आताचं सरकार देव, देश आणि धर्मासाठी आहे.


शिवसेनेची एक मोठी चूक झाली, हे चित्र निर्माण केले. रोज प्रेस घेऊन संजय राऊत यांनी भाजपसोबत परत जाण्याचे दरवाजे बंद केले. तुमचा वाद हा फक्त अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावरून झाला, मग ते एवढे का वाईट झाले? पण दरवाजे बंद झाल्याचं चित्र निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादीची आम्हाला डिवचण्याची हिम्मत वाढली. 


ठाकरे परिवाराचे आता स्थान काय? 
शिवसेना परत एक व्हावी हीच इच्छा आहे. मुख्यमंत्री पद हे चुंबकीय शक्तीचे असते, आपण नेहमीच बघितलं. पण आपण मुख्यमंत्री असताना आपले अपक्षच नाहीतर तुमचे 50 लोक का तुमच्यापासून दूर झाले आत्मचिंतन करा. मंत्रालयात तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अडीच वर्षे गेले नाहीच. पण अत्यंत दुःखाने सांगतो, ते अडीच वर्षे शिवसेना भवनात ही गेले नाहीत. ज्या दिवशी त्यांनी वर्षा सोडली, तिथे जे शिवसैनिक गेले ते पहिल्यांदा आणि शेवटचे गेले होते.