नागपूर : राष्य्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे ईशान्येकडील राज्य आज भारतात आहेत, असा दावा सरसंघचालक मोहन भागवतांचा यांनी केला आहे. अरुणाचल प्रदेशातील परिस्थितीवर एका स्वयंसेवकाने लिहिलेल्या 'शुभारंभ' या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.


भागवत म्हणाले की, "ईशान्येकडील राज्यात संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्यांमुळे परिस्थिती बदलली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्येकडील राज्य भारतापासून वेगळे होतील, आसामचे काश्मीर होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. आता परिस्थिती बदलली आहे. तिथले लोक भारतात राहू इच्छितात. 50 वर्षांपूर्वी काही लोकांनी ( स्वयंसेवकांनी ) तिथे जाऊन सेवाकार्य सुरु केले आणि आजही ते सुरु आहे, त्यामुळे ही परिस्थिती बदलणे शक्य झाले"

मोहन भागवत म्हणाले की, "ईशान्येकडील राज्यांच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील स्थितीची तुलना करताना सरसंघचालक म्हणाले की, आज अरुणाचल प्रदेशात भारताच्या पक्षात आणि चीनच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत. या परिस्थितीतील हे बदल शक्य झाले आहेत. त्या लोकांमुळे ज्यांनी 50 वर्षांपूर्वी आपुलकीच्या भावनेतून आणि स्वयंप्रेरणेतून तिथे जाऊन कार्य सुरु केले होते. आजही ते कार्य अविरतपणे सुरु आहे"

भागवत म्हणाले की, "ईशान्येकडील राज्यातील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल काही लोक बोलतात. परंतु, हे लक्षात ठेवा की त्यासाठी आपणही तितकेच जबाबदार आहोत. जेव्हा ईशान्येकडील राज्यातून लोक दिल्लीत येतात, तेव्हा काही लोक त्यांना चीनचे असल्याचे संबोधतात. हा आपला दोष आहे. आपण त्यांना परके मानतो, ही आपली चूक आहे. देशातील नागरिकांनी ईशान्यकडील लोकांबद्दलचा दुरावा दूर केला तर समस्या सुटतील"