RSS Chief Mohan Bhagwat: लोकसंख्येला देशावरील ओझं न समजता मनुष्यबळ म्हणून पाहिले पाहिजे असे प्रतिपादन करतानाच संप्रदाय, पंथांच्या लोकसंख्येत असंतुलित वाढ झाली की देश तुटतो असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी म्हटले. संघाच्या दसरा मेळाव्यात संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. 


नागपूर येथे झालेल्या संघाच्या पांरपरिक दसरा मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन करताना सरकारचे कौतुकही केले आहे. आपल्या भाषणात मोहन भागवत यांनी म्हटले की, जितकी लोकसंख्या असेल तितका त्याचा ताण असेल हे खरे आहे. पण, तीच लोकसंख्या मनुष्यबळ म्हणून वापरली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. कोणत्याही देशात तरुणांची लोकसंख्या 57 कोटी नाही. चीनदेखील आता वयस्कर झाला असून भारत त्यांच्या तुलनेत तरुण असल्याचे भागवत यांनी म्हटले.  लोकसंख्या कमी झाली तर अनेक समाज आणि भाषा नष्ट होतात. त्याच वेळी, लोकसंख्या वाढ देखील संतुलित असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसंख्या वाढीचा असमतोल असेल, तर त्याचे काय परिणाम होतात, हे आपण 50 वर्षांपूर्वी अनुभवले आहे. लोकसंख्या वाढीत पंथ, संप्रदाय यांच्यातील देश तुटतो. त्यामुळे या असंतुलनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सरसंघचालकांनी म्हटले. लोकसंख्या नियंत्रणाबाबत धोरण तयार करण्याची आवश्यकता असून कोणालाही यातून विशेष सवलत अथवा त्यांना वगळता कामा नये असेही सरसंघचालकांनी आपल्या भाषणात म्हटले. 


सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, काहीजणांकडून भारताची प्रगती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घटकांकडून भारतातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सुरू असून भेदभाव वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. देशात दहशतवाद वाढावा, अराजकतेची स्थिती निर्माण आणि लोकांना कायद्याचा आदर वाटू नये अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रयत्न कोण करतोय हे सांगण्याची आवश्यकता नाही. सरकारकडून अशा लोकांवर कारवाई सुरू असून आपण सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटले. 


मातृभाषेत शिक्षण हवे


आपल्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणात मातृभाषेचा समावेश करण्यात येत आहे. त्यानुसार, आता पाठ्यक्रम पुस्तके आणि शिक्षकदेखील तयार होत आहे. पण, आपण आपल्या पाल्यांना मातृभाषेतील शिक्षणासाठी पाठवतो का, असा सवाल भागवत यांनी यावेळी केला. करिअरसाठी इंग्रजीची आवश्यकता आहे, हे एक मिथक असून जर मातृभाषेतील शिक्षणासाठी आपण आपल्या मुलांना पाठवले नाही तर सरकारचे शैक्षणिक धोरण यशस्वी होऊ शकेल का, असेही त्यांनी म्हटले.


इंग्रजांनी भारतावर आपले शैक्षणिक धोरण लादले. त्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण घेऊन अनेक महापुरुषांनी इंग्रजांविरोधात संघर्ष केला. इंग्रजांविरोधात संघर्ष करण्याचा संस्कार त्यांना शैक्षणिक धोरणातून नव्हे तर समाज आणि कुटुंबातून मिळाले होते. त्यामुळे शिक्षणासोबत कुटुंब आणि समाजाचे संस्कारदेखील आवश्यक आहेत. 


सामाजिक समतेसाठी पुढाकार घ्या


मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सामाजिक समतेचाही मुद्दा मांडला. भागवत यांनी म्हटले की, डॉ. आंबेडकर यांनी संविधानामुळे राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळतील. मात्र, सामाजिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे म्हटले होते. सामाजिक समानतेसाठी कायदे आहेत. मात्र, विषमता आपल्या मनात आहे. मनातील ही विषमता दूर सारण्याची आवश्यकता असून सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी म्हटले. मंदिर, पाणवठा आणि स्मशानभूमी आदी सगळ्यांसाठी एकच असायला हवे, असे भागवत यांनी म्हटले.