नागपूर : पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणायचे 'घूस के मारुंगा..', मात्र दहशतवाद्यांना मारायला एअर स्ट्राईकमध्ये मोदी स्वतः घुसले होते का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. शरद पवार नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे अनिल देशमुख यांच्या प्रचारसभेत बोलत होते.


पवार यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या राजकीय परिस्थितीचे उदाहरण दिले. पवार म्हणाले की, तेव्हा देशाचे सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत होते. मी स्वतः सरकारने बोलावलेल्या बैठकीत सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेऊन 'आम्ही देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करणार नाही', असे सांगितले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांचे गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्वांनी सैन्याच्या शौर्याचे राजकीय भांडवल केले.

पवार म्हणाले की, लढाई लढली सैन्याने मात्र मोदी यांनी निवडणुकीत पुलवामा हल्ला आणि नंतरच्या एअर स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेतल्याचा आरोप शरद पवारांनी केला. कलम 370 हटवायला कोणाचाच विरोध नव्हता. मात्र काही विरोधक ते कलम हटवताना तिथल्या लोकांना विश्वासात घ्या, संसदेच्या संयुक्त समितीकडे विषय देऊन सखोल चर्चा करा, असे म्हणत होते. मात्र त्या विरोधकांवर देशद्रोही असल्याची टीका केली गेली, अशी खंतही पवारांनी बोलून दाखविली. शिवाय कलम 370 नंतर काश्मीरच्या परिस्थितीबद्दल पंतप्रधान यांना पत्र लिहिणाऱ्या साहित्यिक, कलावंत, विचारवंत लोकांना देशद्रोही ठरवले गेले.