नागपूर : काँग्रेसने येडीयुरप्पा यांच्या डायरीचा आधार घेत जे आरोप केले आहे ते काँग्रेसचा बालिशपणा आहे. आयकर विभागाने त्याची चौकशी केली आहे, खालची स्वाक्षरी खोटी करून ते कागद तयार केले आहे. या राजकारणातील ‘डर्टी ट्रिक्स’ आहेत. हे हास्यास्पद आरोप असून गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.


कर्नाटकात बीएस येदियुरप्पा सत्तेवर असताना कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता. यासंबधी एक डायरी सीबीआयला मिळाली असल्याचा दावाही सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला होता. डायरीमध्ये 1800 कोटींच्या व्यवहाराबद्दल लिहिलं असल्याचा सुरजेवाला यांनी दावा केला होता. 'द कॅरावान' मॅगझिननं प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारे काँग्रेसने हे आरोप केले होते.

या डायरीच्या प्रत्येक पानावर येदियुरप्पा यांचं हस्ताक्षर असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र डायरीची सत्यतेबाबत कोणताही दावा काँग्रेसने केलेला नाही. या संपूर्ण प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या बड्या नेत्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यावर बोलताना गडकरी यांनी हे हास्यास्पद आरोप असून गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.

नागपुरातून किमान साडे चार लाखांच्या रेकॉर्ड मतांनी निवडणूक जिंकेल. असेही यावेळी ते म्हणाले. यावेळी ते म्हणाले की, नागपुरात 70 हजार कोटींचे विकास काम 5 वर्षात आणले आहेत. मिहानमध्ये 50 हजार रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. त्यापैकी 25 हजार रोजगार मिहानमध्ये निर्माण केले आहेत. मेट्रो आणि  इतर विकास प्रकल्पात 25 हजार रोजगार निर्माण केले आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर आम्ही 300 पेक्षा जास्त जागा जिंकू तर महाराष्ट्रात गेल्या वेळपेक्षा 2 ते 3 जागा जास्त मिळतील. मोदी नागपूरलाही येऊ शकतील अजून त्यांचे पूर्ण कार्यक्रम अजून ठरलेले नाही. ते जास्तीत जास्त जागांवर जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, असेही त्यांनी सांगितले.

प्रियंका गांधी यांनी गंगेतून प्रवास केला आहे. गंगेचे पाणी ही चाखले. हे आमचा कामाची पावती आहे. एकाप्रकारे त्यांनी आमच्या कामाला प्रमाणपत्रच दिले आहे, असेही ते म्हणाले.