नागपूर :  ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बालेकिल्ल्यात स्मार्ट प्रीपेड मीटर (Smart Prepaid Meter)  योजनेला कडाडून विरोध केला आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेच्या विरोधात विदर्भवाद्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील (Nagpur News)  घराची  सुरक्षा वाढवली आहे. 


महावितरणच्या विजेच्या प्रीपेड मीटर विरोधात विविध संघटनांची 'नागरिक संघर्ष समिती' स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून प्रीपेड मीटर विरोधात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घराबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता हे आंदोलन व्हेरायटी चौकात करणार आहे. यामध्ये जय विदर्भ पार्टीसह विविध संघटनांचा संघर्ष समितीत सहभाग आहे. 


स्मार्ट मीटर योजनेला का विरोध?


महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन,  नागपूर शहर काँग्रेससह इतरही अनेक कामगार संघटना, संघर्ष समिती,  राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांकडून स्मार्ट प्रीपेट मीटर योजनेला विरोध होत आहे.  स्मार्ट मीटरमुळे विद्युत विभागातील अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील का अशीही भीती व्यक्त केली जात आहे. प्रीपेड पद्धत ही गरीब वर्गाला परवडणारी नाही. त्यामुळे हातावर पोट असलेले अचानक वीज गेली तर तातडीने पैसे कसे भरतील अशीही शंका उपस्थित केली जात आहे.त्यामुळे या  स्मार्ट मीटर योजनेला विरोध होत आहे. 


स्मार्ट मीटर म्हणजे काय? 


आपण वापरत असलेल्या विजेच्या मीटरचा  अत्याधुनिक प्रकार म्हणजे स्मार्ट मीटर आहे. रोज आपण किती वीज वापरली त्याचे  रिडींग दर महिन्याला वीज कंपनी करते व त्यानुसार ग्राहकाला विजेची बील  पाठवले जाते.  पण स्मार्ट मीटरमध्ये आपण किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला आपल्या मोबाइलमध्ये कुठूनही, केव्हाही पाहता येणार आहेत. तसेच वीजवापरासाठीचे पैसेही कुठूनही, कधीही भरता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकाला आपला वीजवापर कमी-जास्त करता येईल किंवा विजेच्या वापराबाबत काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत तत्काळ तक्रार करता येणार आहे.


हे ही वाचा :


Sudhir Mungantiwar: राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रावर वस्ती होईल तेव्हा...


Chandrakant Patil: विनोद तावडे काहीही झाले तरी मोठेच होतील, भाजपमध्ये एकदा ठरलं की मुंगीलाही कळत नाही, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य!