Nagpur News : सद्या नागपूर शहर (Nagpur) आणि ग्रामीण भागात डोळ्यांची साथ सुरु आहे. जवळपास 25 टक्के लहान मुलांमध्ये डोळ्याच्या साथीची (eye epidemic) लक्षणे दिसत आहेत. त्या पार्शवभूमीवर नागपूर महानगर पालिका आणि जिल्हा प्रशासनाने  शाळांना संपर्क साधून लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या मुलांना डोळ्याच्या साथीची लाग झाली आहे, त्यांना शाळेत न पाठवण्याच्या सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. काही प्रमाणात मोठ्या नागरिकांमध्ये देखील या साथीचा संसर्ग पाहायला मिळत आहे.


डोळ्याच्या आजाराची लक्षणं काय 


नागपूरच्या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ओपीडीमध्ये 25 टक्के रुग्ण (कंजंक्टिवायसीस) डोळ्याच्या साथीच्या आजाराचे येत आहे. तर नागपूर महानगरपालिकेत फक्त 380 रुग्णाची नोंद आहे. डोळे लाल होणे, डोळ्यात आग होणे, डोळे दुखणे, डोळे सुजणे, डोळ्यातून स्त्राव होणे, धूसर  दिसणे अशी याआजाराची लक्षणं आहेत. 


उपाय काय करावा


नियमीत स्वच्छता राखावी, नियमित हात धुवावे, डोळ्याला वारंवार हात लावू नये, दुसऱ्यांच्या वस्तू वापरु नयेत. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनाही त्रास


गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल (Climate Change) होत आहे. त्यामुळं भंडारा (Bhandara) शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या संसर्गानं त्रस्त केलं आहे. यात लहान बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं ओपीडीत वाढ होत आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय असो की जिल्ह्यातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय असो, तिथं डोळ्यांच्या आजारासाठी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या वाढल्याचं चित्र बघायला मिळत आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील दोन दिवसात डोळ्यांच्या संसर्गामुळं त्रस्त असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात पोहोचले आहेत. दररोज 40 पेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. अनेकांना डोळे लाल होणे आणि डोळ्यांना सूज येणे असा त्रास होत आहे. डोळ्यांच्या खासगी रुग्णालयातील आणि शासकीय रुग्णालयातील नेत्र तज्ञांकडील रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 


नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी


डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यानं कुटुंबातील अनेकांना त्रास होत आहे. वातावरणातील बदलामुळं डोळ्यांचा संसर्ग वाढत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. त्यामुळं नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन रुग्णालय प्रशासनानं केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Health Tips : तुमचे डोळे वारंवार लाल होतात? ही सामान्य समस्या नाही तर आहे गंभीर आजार; वेळीच सावध व्हा