नागपूर : नागपूरच्या (Nagpur) एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राजीवनगर बसस्टॉपजवळ पान टपरीवर बसलेल्या दोन मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. कारमध्ये बसून आलेल्या सात ते आठ अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करुन पळून गेले. ही घटना बुधवारी (16 ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. 


राकेश मिश्रा (वय 27 वर्षे) आणि रवी जयस्वाल (वय 28 वर्षे) दोघेही रा राजीवनगर, हिंगणा रोड नागपूर अशी जखमी झाले आहेत. मात्र खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान राकेशचा मृत्यू झाला. दोघेही या भागात आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होते अशी माहिती आहे. 


टपरीवर बसलेल्या मित्रांवर सपासप वार 


दररोज सायंकाळी ते बसस्टॉपवर येऊन बाजूला एका टपरीवर बसायचे. रात्री पण तिथे बसून असताना काही अंतरावर कारमधून 6 ते 7 जण उतरले. त्यांनी तोंडाला दुपटे बांधले होते. राकेश आणि रवीच्या जवळ येऊन त्यांनी धारदार हत्याराने सपासप वार सुरु केले. राकेश हा जखमी होऊन जागीच निपचित पडला. तर रवी हा जीव वाचवण्यासाठी बाजूला असलेल्या एका महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घुसला आणि काचेचे केबिन आतून बंद करुन घेतले. आरोपी त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचले. त्यांनी काचेची केबिन फोडून आतमध्ये घुसून रुग्ण आणि डॉक्टर समोरच त्यालाही गंभीर जखमी केले आणि  कारमध्ये बसून फरार झाले.


हल्ल्याचं कारण अस्पष्ट


एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार भीमा नरके आणि स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. हा हल्ला नेमका कशासाठी झाला हे कळू शकलेलं नाही. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.


हेही वाचा


Nagpur Crime : नागपुरात 24 तासात दोन हत्या, दोन्ही घटनांमध्ये पतीने पत्नीला संपवलं