हत्या झाल्याचा पोलिसांना खोटा फोन करुन तरुणाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2018 07:28 PM (IST)
नागपुरात राहणाऱ्या 27 वर्षीय निशांत वाघमारेने 29 डिसेंबरच्या रात्री पोलिसांना फोन केला होता. भिवसनखोरी परिसरात एक हत्या झाल्याची माहिती त्यांना दिली. त्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहचले, मात्र तिथे काहीच घडलं नसल्याचं पोलिसांना लक्षात आलं.
नागपूर : हत्या झाल्याची खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या तरुणाने काही वेळानंतर स्वतःच आत्महत्या केली. नागपुरात भिवसनखोरी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरात राहणाऱ्या 27 वर्षीय निशांत वाघमारेने 29 डिसेंबरच्या रात्री पोलिसांना फोन केला होता. भिवसनखोरी परिसरात एक हत्या झाल्याची माहिती त्यांना दिली. त्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहचले, मात्र तिथे काहीच घडलं नसल्याचं पोलिसांना लक्षात आलं. त्यामुळे पोलिस पथक परत गिट्टीखदान पोलिस स्टेशनला पोहचलं. पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या निशांतने थोड्या वेळानंतर स्वतःच गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे निशांतने याआधीही अनेक वेळा पोलिसांना फोन करुन विविध ठिकाणी गंभीर गुन्हे घडल्याबद्दल खोटी माहिती दिली होती. नेहमीच पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणाने पुन्हा एकदा पोलिसांना खोटी माहिती देऊन आत्महत्या का केली असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असून मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे निशांत असं वागत असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.