नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नागपूर हा गृह जिल्हा आहे. त्याच जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण एका युवा अभियंत्याने पोलिसांवर गंभीर आरोप करत ते सामान्य नागरिकाला नव्हे तर माफियांच्या बाजूने आहेत असा आरोप केला आहे. सोनू तिवारी नावाच्या या अभियंत्यांवर परिसरातील माफियाने एकदा नव्हे, तर दोनदा हल्ले केलेत. सोनूचा दोष फक्त एवढाच होता की त्याने वस्तीत कारमध्ये बसून दारू पिणाऱ्या या गुन्हेगारांना थांबविण्याचे प्रयत्न केले.


नागपुरात कायदा सुव्यवस्थेची स्थितीसंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख सतत पोलिसांची स्तुती करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात. मात्र, सामान्य माणसांना नागपुरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांच्या असंवेदशीलतेचा किती वाईट अनुभव आलाय हे उदाहरणातून समोर आलंय. सोनू तिवारी या अभियंत्यांवर सलग दोन दिवस परिसरातील माफियाने हल्ले केले. मात्र, या घटनेची तक्रार देण्यासाठी खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पहाटे तीन वाजेपर्यंत मानसिक छळ केल्याचा आरोप सानूने केलाय. सोनू तिवारीचा आरोप आहे, की होळीच्या दिवशी रात्री जेवणानंतर घराजवळ फिरत असताना परिसरात सट्ट्याचा व्यवसाय करणाऱ्या काही गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी हल्ला केला. सोनूचा दोष एवढाच होता की त्याने वस्तीत एका कारमध्ये बसून मद्यपान करणाऱ्या त्या तरुणांना थांबविले होते. रागाच्या भरात या तरुणांनी सोनूवर पिस्तूल ताणली होती.

चोरी करणारी महिला गँग अटकेत, 'ते' चोरी करण्यासाठी रिक्षाने नागपूर गाठायचे

तक्रार दिल्यानंतर घरावर गुंडांकडून हल्ला
सोनूच्या वृद्ध आईने मध्ये पडत कसेतरी आपल्या मुलाला गुन्हेगारांच्या तावडीतून सोडविले होते. रात्री या घटनेची तक्रार द्यायला खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या सोनू तिवारी आणि त्यांच्या वृद्ध आईसोबत तिथल्या पोलिसांनी गैरवर्तन केल्याचंही सोनूनं म्हटलंय. तर, सट्ट्याचा व्यवसाय करणाऱ्या त्या गुन्हेगारांची बाजू घेत तक्रार न देण्यासाठी दबाव आणल्याचा सोनूचा आरोप आहे. सोनू तक्रार देण्याच्या आपल्या अधिकारावर ठाम राहिल्याने पोलिसांनी अनेकतास बसवल्यानंतर पहाटे तीन वाजता थातुरमातुर तक्रार नोंदवत तिवारी कुटुंबीयांना घरी पाठवून दिले. मात्र, दुसऱ्या दिवशी गुन्हेगारी वृत्तीच्या त्या तरुणांनी सोनू तिवारीच्या घरावर तलवारी, लोखंडी रॉड्स आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवत बाहेर उभी असलेली कार आणि दुचाकीचे नुकसान केलं. शिवाय घराच्या मुख्य दारावर तलवारीने हल्ला करत ते तोडून टाकले.

गुंडांचे पोलिसांसोबत अर्थपूर्ण संबंध
आमच्या विरोधात पोलिसांकडे जाण्याची हिम्मत कशी केली, असा या गुंडांचा प्रश्न होता. तोडफोड केल्यानंतर सर्व गुंड कोणत्याही भीतीशिवाय तिथून निघून गेले. तिवारी कुटुंबीयांनी या तोडफोडीची तक्रारही खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्या विरोधात कुठलीच कारवाई पोलिसांनी केलेली नाही. गुंड वृत्तीच्या लोकांविरोधात पोलिसांकडे दाद मागणे माझी चूक आहे का? असा प्रश्न आता सोनू तिवारीने विचारला आहे. त्या गुंडांविरोधात सोनू तिवारीने एकदा नव्हे तर दोनदा तक्रार दिली आहे. त्यांचा खापरखेडा आणि वलनी परिसरात अवैध सट्टा व्यवसाय आहे. त्यांचे पोलिसांसोबत अर्थपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे पोलीस माझ्या तक्रारींकडे लक्ष देत नसल्याचा सोनू तिवारीचा आरोप आहे. या घटनेसंदर्भात एबीपी माझाने खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला असता आवश्यक कारवाई सुरू आहे, एवढेच उत्तर देण्यात आले. मात्र, माहिती देण्यास तिथल्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.

Nagpur traffic | नागपूर ट्रॅफिक पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न, घटना सीसीटिव्हीत कैद | ABP Majha