नागपूर : देशातील सहिष्णुता-असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 99 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वींमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला.


नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षीय भाषण करताना गज्वी यांनी देशातील असहिष्णुतेच्या संदर्भात मुद्दा उचलला होता. त्याला उत्तर देत संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गज्वी यांनी उचललेल्या मुद्द्याचा उल्लेख करत देशात कुठेही असहिष्णुता नाही, उलट भारतात फक्त एकदाच असहिष्णुता दिसून आली आणि ती म्हणजे आणीबाणीच्या काळातच होती, असे सांगून फडणवीस यांनी गज्वी यांचा मुद्दा खोडून काढला होता.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर नाट्य संमेलनाच्या समारोपाला बोलताना गज्वी यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले.  देशामध्ये जी सहिष्णुता नावाची जी गोष्ट आहे ती प्रत्यक्षात उतरली तर ते जास्त बरे होईल असे वक्तव्य गज्वी यांनी केले. रुपयाच्या नाण्याला दोनच बाजू आहेत, असे आपण मानतो. प्रत्यक्षात त्याला पाच बाजू आहेत. तसेच सहिष्णुतेचेही आहे. आपल्या देशात सहिष्णुता आहे असे आपण म्हणतो. परंतु बारकाईने बघितले तर त्याचे असणे – नसणे कळून येते. राजकीय नेते हे माझे काही शत्रू नाही. आपणा सर्वामध्ये माणुसकीचे नाते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री जसे म्हणतात त्याप्रमाणे सहिष्णुता ही गोष्ट प्रत्यक्ष व्यवहारात उतरली तर बरे होईल, असे  गज्वी यांनी म्हटले.

99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे रविवारी सूप वाजले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, संमेलनाचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर उपस्थित होते.

गज्वी म्हणाले की, मी प्रारंभी माझ्या नाटकीय घडणीबद्दल भाषणात बोलावे असे माझे एक मन म्हणत होते. परंतु माझे दुसरे मन मला सांगत होते की, आजूबाजूला जे घडते आहे ते सत्य तू सांगणार आहेस की नाही? त्यामुळे मी सत्य बोलायचे ठरवले. आज राजकारणी मंडळी ही राजा असतील तर आम्ही प्रजा आहोत. प्रजेला सुखी ठेवणे हे राजाचे कर्तव्यच आहे.  सामान्य जनतेचा विचार करणार नसाल आणि आपल्याच नशेत राहणार असाल तर तुम्हाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. ज्यांना प्रजेला सांभाळता येत नाही ते राज्य सांभाळू शकत नाही. केवळ विनोदी भूमिका करणाऱ्यांनी गंभीर भूमिका केली पाहिजे. माणसाने रोज बदलले पाहिजे. जर तुम्ही बदलला नाहीत तर साचलेपण येते, असेही गज्वी म्हणाले.