नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (marathi sahitya sammelan) आता 50 लाखांऐवजी दोन कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) बैठकीत मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. मराठी साहित्य समंलनाचे अनुदान वाढवावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जातेय. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात ही मागणी पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय.  


97 वे साहित्य संमेलन जळगावच्या अमळनेरमध्ये भरवण्यात येणार आहे. पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्ध्यात झालेल्या साहित्य संमेलनानंतर आता 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार यासंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बैठक पार पडली होती. दरम्यान आता या साहित्य संमेलनासाठीच्या अनुदानात वाढ केल्यामुळे साहित्य क्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी समोर आलीये. 


 97 वे साहित्य संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत होणार


साहित्य महामंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार, साने गुरुजींच्या कर्मभूमीत म्हणजेच जळगावच्या अमळनेरमध्ये पुन्हा साहित्य रसिकांचा मेळा भरणार आहे. 97 वे साहित्य संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत होणार आहे. 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे स्थळनिवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. रमेश वंसकर, श्री. प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक हे होते.


स्थळनिवड समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळनिवड समितीने सर्वानुमते मराठी वाङमय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याला मान्यता दिली. अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा साहित्य संमेलन होत आहे.


अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा मराठी साहित्य संमेलन


पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878 मध्ये पुणे शहरात झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे होते. जळगाव जिल्ह्यात 1936 मध्ये मराठी साहित्य संमेलन झाले होते. माधव त्रिंबक पटवर्धन त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. 1952 मध्ये अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते. त्यानंतर आता अमळनेर शहरात दुसऱ्यांदा हे संमेलन होत आहे. यापूर्वी, जळगाव शहरात 1984 मध्येही संमेलन झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षस्थान शंकर रामचंद्र खरात यांनी भूषविले होते.


हेही वाचा : 


मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर 17 लाख सरकारी कर्मचारी संप मागे घेण्याच्या तयारीत, 18 मागण्या कोणत्या ?