Nagpur News : नागपुरातील उड्डाण पुलांवरील अनियंत्रित वाहनांमुळे नागरिकांचा जीव जात असून मंगळवारी परिसरात असलेल्या उड्डाणपुलावर अनियंत्रित ट्रॅव्हल्सने अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चिरडले. या अपघातात तिची मैत्रीणही गंभीर जखमी झाली आहे. काही महिन्यांपूर्वी सक्करदरा येथील उड्डाणपुलावरही झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जीव गेला होता. तसेच सीताबर्डी येथील उड्डाणपुलावरही अशीच घटना घडली होती. मात्र तरी यावर काही ठोस उपाय योजना करण्यात आली नाही, हे उल्लेखनीय.


प्राप्त माहितीनुसार रुचिका आणि नंदिनी या दोन्ही मैत्रिणी एका वॉकथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या व तेथून परतताना हा अपघात घडला. रुचिका दीपक खिलवानी ( वय 18, हेमू कॉलनी, जरीपटका) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, नंदिनी बत्रा ही विद्यार्थिनी जखमी झाली आहे. दोन्ही विद्यार्थिनी सकाळी जरीपटक्यातील वॉकथॉन रॅलीत सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. भूक लागल्याने नाश्ता करण्यासाठी त्या एका मंगळवारी बाजार येथे नाश्ता करण्यासाठी गेल्या होत्या. तेथून परत येत असताना मित्राची दुचाकी त्यांच्या दुचाकीच्या मागे होती.


ट्रॅव्हल्स बसच्या वेगाने केला घात


दरम्यान मंगळवारी पुलावर समोरून PY 05 C 1672 या क्रमांकाची ट्रॅव्हल्स बस वेगाने आली व रुचिका चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली. बसचा वेग जास्त असल्याने, दोघीही रस्त्यावर फेकल्या गेल्या व गंभीर जखमी झाल्या. त्यांना घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने मेयो (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी रुचिका हिला तपासून मृत घोषित केले, तर नंदिनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी (Nagpur Police) या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.


वर्दळीच्या रस्त्यांवरच ट्रॅव्हल्सचा थांबा


शहरातील यशवंत स्टेडियमवर अघोषित ट्रॅव्हल्स थांबा तयार झाला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आपली बस वर्क शॉपच्या कुंपणावर येथे दररोज ट्रॅव्हल्स बसेस थांबतात. तसेच त्यांची पार्किंगही येथेच केली जाते. विशेष म्हणजे ट्रॅव्हल्सचा हा अवैध थांबा धंतोली पोलीस ठाण्यापासून 50 मिटरच्या अंतरावर आहे. तसेच वर्धा मार्गावरील रेडिसन ब्लू हॉलेटसमोरही अशाच प्रकारे ट्रॅव्हल्स रस्त्यावरच थांबतात. याठिकाणी रस्त्याचे सिमेंटीकरण सुरु असल्याने आधीच अर्धा मार्ग बंद करण्यात आला आहे. तरी याठिकाणी रस्त्यावर बस थांबवून सवारी घेत असतात. विशेष म्हणजे छत्रपती चौक आणि पुढच्या चौकात वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करतात. मात्र भर रस्त्यावर उभी असलेली ट्रॅव्हल्स या पोलिसांना दिसत नाही का असा सवाल परिसरातील संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.


ही बातमी देखील वाचा...


महाविकास आघाडीबद्दल वंचित बहुजन आघाडीची भूमिका, प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले