Avinash Bhosale : येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अविनाश भोसले यांनी सीबीआय रिमांडला विरोध केला आहे. कोर्टाने अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 


सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून  अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आले होते. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला. भोसलेंच्या रिमांडला विरोध करत दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सोमवार 30 मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 


अविनाश भोसलेंच्या वकिलांचा रिमांडला विरोध का?


या प्रकरणात तपासयंत्रणेकडून आरोपपत्र दाखल झालं आहे. आरोप निश्चित झालेत. त्यामुळे आता नव्यानं यात कुणालाही अटक करता येणार नसल्याचा युक्तिवाद अविनाश भोसलेंच्या वकिलाने केला. एफआयआरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की, यात अनेक माहिती नसलेल्या आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे या कारवाईला आव्हान देता येणार नाही. हायकोर्टानं या खटल्याला 13  जूनपर्यंत स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे सत्र न्यायालयानं यावर पुढील सुनावणी 20 जूनला घेण्याचं निश्चित केलं आहे. तोपर्यंत यात नव्यानं रिमांडही घेता येणार नाही, असेही वकिलांनी म्हटले. 


अविनाश भोसले यांना अटक प्रकरण काय?


- येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ईडी, सीबीआयकडून याआधी चौकशी
- 2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले
- वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप
- सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता
- बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश
- ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त


कोण आहेत अविनाश भोसले?


अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.