मुंबई : मुंबईकरांना 1 एप्रिलपासून वांद्रे- वरळी सी-लिंकसाठी जास्तीचा टोला द्यावा लागण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार , सी-लिंकवर अपेक्षेपेक्षा वाहनं कमी असल्यानं ही टोलवाढ केली जात आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यानुसार कार आणि एसयूव्ही गाड्यांना आधी 60 रुपये टोल होता. पण नव्या दरानुसार आता  70 रुपये टोल द्यावा लागू शकतो. तर रिर्टनसाठी 90 रुपयांवरुन 105 रुपये इतका टोल भरावा द्यावा लागेल.

याशिवाय, पासधारकांनाही आजा जादाचे पैसे भरावे लागणार आहेत. पासधारकांना तीन हजाराच्याऐवजी आता 3500 रुपये भरावे लागतील.

2009 पासून आतापर्यंत सी-लिंक टोलमधून 692 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे. तर सी-फेसवरच्या टोलनाक्याची वसुलीची मुदत ही आधी 2039 सालापर्यंत होती ती 2052 सालापर्यंत करण्यात आली आहे.

दरम्यान, दर तीन वर्षांनी टोलमध्ये वाढ करण्यात येत असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी 2015 मध्येही टोलमध्ये 18 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

त्यावेळी एसयूव्ही गाड्यांना 55 रुपये टोल द्यावा लागत असे. पण टोल वाढीनंतर त्यांना 60 रुपये द्यावे लागले. त्याच प्रमाणे रिटर्नसाठी 82.50 रुपये आकारले जात होते. पण टोल वाढीनंतर 90 रुपये द्यावे लागले. त्यामुळे आता पुन्हा तशाच प्रकारची टोलवाढ करण्यात आल्याने, त्याचा नागरिकांना नाहाक त्रास सहन करावा लागणार आहे.