नवी मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर, याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. ज्या कंपनीला उंदीर मारण्याचं कंत्राट दिलं, ती कंपनीच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्त्वात नसल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत समोर आलं आहे. ही संस्था केवळ कागदोपत्री आहे.


उंदीर मारण्याच्या कंत्राटामध्ये एक कंत्राट हे विनायक सहकार मजूर संस्थेच्या नावे आहे. या संस्थेने 17 हजार उंदीर मारल्याचा दावा आहे. पण, ज्यांनी ही संस्था सुरू केली, त्यांनाच ही संस्था कोण चालवतं हे माहीत नाही. अमोल शेडगे यांच्या नावावर ही संस्था स्थापन केली. मात्र आता अमोल शेडगेच हयात नाहीत. असं असताना अमोल शेडगे यांच्या खोट्या सह्या करून ही संस्था कार्यरत आहे.

आनंद शेडगे यांनी आपले नातेवाईक वामन देवकर यांच्या सल्ल्याने 2002 साली विनायक सहकार मजूर संस्था स्थापन केली. 2004 साली संस्था रद्द झाल्याचं सांगितलं असताना ही संस्था अजून कार्यरत असल्याचं समोर आलं. यावेळी, त्यांनी संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली असता, उडवा-उडवीची उत्तरं दिली. मग शेडगे कुटुंबीयांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढली असता, मृत असलेला मुलगा अमोलच्या नावाने खोटी सही करून ही संस्था सुरू असल्याचं समोर आलं. आता हा उंदीर घोटाळा समोर आल्याने त्याच्या खाली अजूनही खोट्या संस्थांच्या नावे अनेक घोटाळे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उंदीर घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा ही संस्था कार्यरत असल्याचं आता शेडगे कुटुंबीयांना समजलं आहे. ही संस्था कोण चालवत आहे,  त्याला शोधून शिक्षा करावी, अशी मागणी शेडगे कुटुंबीय करत आहेत.

मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप

खडसेंचा नेमका आरोप काय?

मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आले. 6 महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं.

मात्र 7 दिवसांतरच सर्व उंदीर मारले असल्याचं सांगण्यात आलं. दिवसाला 45 हजार उंदीर मारल्याचं सांगितलं.

पण या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. त्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवाना नव्हता.

मंत्रलायत विष आणण्यास परवानगी नाही. धर्मा पाटील यांनी बाहेरुन विष आणलं नव्हतं. ते त्यांनी मंत्रालयात असलेलं उंदीर मारण्याचं विष घेतलं आणि प्राशन केलं. हा खूप मोठा घोटाळा आहे याची चौकशी करा, अशी मागणी खडसेंनी केली.