Worli Hit And Run Case मुंबई: मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात (Worli Hit And Run) बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडण्याच्या प्रकरणात मिहीर शहा (Mihir Shah) हे नाव समोर आलं आहे. आरोपी मिहीर शहा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. राजेश शहा (Rajesh Shah) यांना अटक करण्यात आली आहे. मिहीर शहाचा शोध मात्र पोलीस घेत आहेत. याचदरम्यान महाराष्ट्रामध्ये ‘हिट अँड रन’ च्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत.


काही धनदांडगे, राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकविण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही देखील एकनाथ शिंदे यांनी दिला. हिट अँड रन प्रकरणात कोणीही असो, कोणालाही सोडणार नाही. कडक कारवाई केली जाईल. कायद्यासमोर सर्व समान आहे. जे हॉटेल रात्री उशीरापर्यंत सुरु असतात, त्यांचे लायसन्स रद्द करण्याचे मी आदेश दिले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिले.


सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध- एकनाथ शिंदे


सर्वसामान्य नागरिक हे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ‘हिट अँड रन’ सारखी प्रकरणे अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि पीडितांना न्याय देण्याचे निर्देश एकनाथ शिंदेंनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणांमध्ये दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, किंवा नोकरशहा, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी व आमचे शासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबिंयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सर्व जनतेसाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली.






उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई पोलिसांना कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पुणे पोर्शे प्रकरणानंतर पुणे पोलीस आणि गृहखात्यावर असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच मुंबईतील वरळीत घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची तुलनाही पुणे पोर्शे प्रकरणाशी केली जात आहे. तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पालघरचा उपनेता असल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं होतं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिलं जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल, असं स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा याप्रकरणी कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस खात्याला दिले आहेत. 


आरोपी दारूच्या नशेत-


24 वर्षीय मिहीर शहा देखील व्यावसायिक आहे. तो दारूच्या नशेत असताना हा अपघात घडल्याचा संशय आहे. तो रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसह दारू पार्टीसाठी गेला होता. बारमधून निघाल्यावर तो गोरेगावला गेला. मिहीर फरार झाल्यामुळे तो दारूच्या नशेत होता की नाही, याबाबत निश्चित काही निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले.


कोणत्या कलमान्वये झाला गुन्हा दाखल?


धरती हिंट अॅण्ड रन प्रकरणात पोलिसांनी कलम २०५, २८९, १२५ (ब), २३८, ३२४ (४) भारतीय न्याय संहितासह कलम १८४, १३४(अ), २३४ (ब), १८७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे.