मुंबई : बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हाप्रमुखांनी शिवसेना मंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. त्यावर मंत्री संतापले आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख आणि मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली.


कोण काय म्हणालं ?

गुलाबराव पाटील, राज्यमंत्री-
जिल्हाप्रमुख मंत्र्यांवर काय आरोप करतात. आम्ही आमच्या कामाचा रिपोर्ट उद्धव ठाकरेंना देतो तसा तुमचा देता का? जिल्हाप्रमुख स्वतःला काय समजतात?

रामदास कदम, मंत्री -
(जिल्हाप्रमुखांना उद्देशून अर्वाच्य भाषा वापरली.)
घराणेशाहीला आळा बसला पाहिजे. जिल्हा परिषदेपासून खासदारकी पर्यंत सर्व जिल्हाप्रमुख बायको, मुलगा, पुतण्या यांचीच नावं का पुढे करतात? हे यापुढे चालणार नाही.

मात्र स्वतःच्या मुलांसाठी प्रयत्नशील असलेले रामदास कदम घराणेशाही मोडण्याचा पायंडा घरापासून सुरु करणार का अशी जिल्हाप्रमुखांमध्येच कुजबुज सुरु झाली.

दिवाकर रावते यांना तर भाषण आटोपतं घ्यावं लागलं. शेतमालाच्या भावावरुन रावते बोलत असतानाही जिल्हाप्रमुख आणि आमदारांनीच आक्षेप घेतला. रावतेंना पुढे बोलूच दिलं नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊतांना रावते यांना थांबवून संजय राऊत यांचं भाषण सुरु करा असं सांगावं लागलं.

संजय राऊत यांच्या भाषणात प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. हे सरकार मी आपलं मानतच नाही कारण मंत्र्यांना अधिकार नाही आणि पदाधिकाऱ्यांची कामं होत नाहीत. त्यामुळे आपआपसातले हेवेदावे सोडून रस्त्यावर उतरून कामाला लागा.

उद्धव ठाकरे यांनी तर लोकसभेच्या तयारीला लागलेल्या भाजपच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत त्यांच्याकडून काहीतरी शिका अशा कान पिचक्या सर्वांना दिल्या.