मुंबई : मुंबई महापालिकेतील शिवसेना आणि भाजपचं 84-82 जागांचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे. कारण वॉर्ड क्रमांक 116 मधून भाजप पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली आहे.


फेब्रुवारी 2017 मध्ये पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 116 मध्ये काँग्रेसच्या प्रमिला पाटील यांचा विजय झाला होता. परंतु त्यांचं निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली.

या दरम्यानच प्रमिला पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील आणि सून जागृती पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता या जागेवर प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आम्ही मुंबई महापालिकेतील 84-82 समीकरण बदलणार, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबईतील एकुण 227 वॉर्डांपैकी शिवसेनेला 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7 आणि इतर उमेदवारांना 14 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे 84 जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. यानंतर भाजपने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतून माघार घेतल्याने मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर विराजमान झाले.