कल्याण : मुंबईपाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यावरही पाणीटंचाईचं संकट घोंघावू लागलं आहे. कारण जिल्ह्यातील अनेक महापालिकांना पाणी पुरवणाऱ्या उल्हास नदीची पातळी घटू लागली असून यामुळे लवकरच जिल्ह्यात पाणीकपात सुरू केली जाणार आहे.


उल्हास नदीपात्रात बारवी धरणातून दररोज ठराविक पाण्याचा विसर्ग केला जातो. हे पाणी मोहने परिसरातील पंपहाऊसद्वारे उचलून पुढे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पुरवलं जातं. कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका आणि एमआयडीसी यासोबतच स्टेम प्राधिकारणाद्वारे येथून पाणी उचललं जातं.


या प्राधिकारणाद्वारे ठाणे, भिवंडी आणि मीरा भाईंदर महापालिकांना पाणीपुरवठा केला जातो. तर एमआयडीसीकडून अंबरनाथ, बदलापूर आणि औद्योगिक परिसराला पाणी पुरवलं जातं. मात्र ऑक्टोबर हिटमुळे मोहने परिसरात उल्हास नदीची पातळी घटू लागली आहे. त्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीलाच अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.


दुसरीकडे बारवी आणि आंद्र धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यापासून एक दिवस पाण्याची उचल बंद ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागाने सर्व महापालिका आणि प्राधिकारणांना दिले आहेत. त्यामुळे याचा सरळ फटका पाणीपुरवठ्याला बसणार आहे. मुंबईनंतर आता ठाणे जिल्ह्यातही पुढील आठवड्यापासून ही पाणीकपात होणार असल्यानं सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी मात्र पळणार आहे.