मुंबई : वांद्रे स्टेशन परिसरात जमा झालेली गर्दी ही पूर्वनियोजित होती का? असा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे एबीपी माझाच्या हाती लागलेला व्हिडीओ. गर्दीत जमलेल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर हा संशय बळावतो.


वांद्रे स्टेशनजवळ जामा मशिदीच्या समोर जमा झालेल्या लोकांमध्ये योजना करण्याचा आणि तरुणांना काय बोलावं हे शिकवण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमधील संभाषण पुढीलप्रमाणे....


व्यक्ती 1 : काही ठरलं की नाही, कोणी येतंय की नाही?
व्यक्ती 2 : सांगितलं ना मीडिया येणार आहेत, पोलीसही


व्यक्ती 1 : चारची वेळ दिली मग आतापासूनच उभे राहिलात तुम्ही.. खूप लवकर उभे राहिलात.
व्यक्ती 2 : काय करणार आता?


व्यक्ती 1 : कशाला, गावाकडे जाण्यासाठी?
व्यक्ती 2 : जेवण नकोय आम्हाला, गावाकडे जायचंय


व्यक्ती 1 : एवढंच बोला, सगळ्यांनी एकत्र बोला, याचं त्याचं ऐकू नका. फक्त सांगा आम्हाला गावाकडे जायचंय


या बातचीतमधून हे समजतं की योजना आखूनच लोक वांद्रे स्टेशनजवळ जमा झाले होते.


जर या लोकांना मुंबईबाहेर दुसऱ्या राज्यात जायचं होतं तर वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात जमा झालेल्या कोणाकडे सामान किंवा साधी पिशवी कशी काय नव्हती असाही प्रश्न आहे.


जमा झालेल्या लोकांनी दावा केला होता की, हे मजूर आहे आणि ते गावाला जात आहे. परंतु गर्दीमध्ये बहुतांश तरुण होते. तर महिला आणि मुलांची संख्या नाममात्र होती.


मुंबईचं वांद्रे रेल्वे स्टेशन हे पश्चिम रेल्वच्या अंतर्गत येणारं उपनगरीय ट्रेनचं स्टेशन आहे, इथून ट्रेन सुटत नाही. उत्तर भारताच्या पंजाब, दिल्ली, गुजरात, राजस्थान, जम्मू इथे जाणाऱ्या ट्रेन मुंबई सेंट्रलवरुन निघतात, ज्याचं पुढचं स्टेशन वांद्रे असतं. वांद्रे स्टेशनपासून सुमारे दीड ते दोन किमी अंतरावर वांद्रे टर्मिनस स्टेशन आहे, इथे यूपी आणि बिहारसाठी एक ते दोन ट्रेन जातात. कारण या ट्रेन 5 ते 6 राज्यांमधून फिरुन जाते आणि प्रवासासाठी 36 ते 40 तास लागतात.


 दिल्लीतील आनंद विहार आणि वांद्र्यातील गर्दीची तुलना केली तर, महिन्याभरापूर्वी आनंद विहारमध्ये लोक मुलाबाळांसह सामान घेऊन तिथे जमा झाले होते. मात्र वांद्रे परिसरात तरुण मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यामुळे जर यांना गावाला जायचं होते त्यांच्याकडे साधी पाण्याची बाटली नव्हतीच, पण ना पिशवी किंवा सामान. त्यामुळे ही गर्दी पूर्वनियोजित होती असं संशय बळावतोच.


Lockdown | वांद्रे गर्दी प्रकरणी उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक


वांद्रे स्टेशन परिसरात मोठी गर्दी
मुंबईच्या वांद्रे पश्चिम परिसरात स्टेशनबाहेर काल (14 एप्रिल) दुपारी मोठ्या प्रमाणात मजुरांची मोठी गर्दी जमा झाली होती. आम्हाला आमच्या घरी सोडा, अशी मागणी ते करत होते. याठिकाणी जमलेले जास्तीत जास्त लोक कामानिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुंबईत आलेले आहेत. लॉकडाऊन उठेल असा विश्वास मजुरांना होता. या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता.


तुम्ही महाराष्ट्रात आहात चिंता करु नका, परप्रांतियांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन


उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष अटकेत
मुंबईतील वांद्रे स्टेशनवर स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी विनय दुबे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (15 एप्रिल) रात्री विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. त्यानंतर त्याला रात्री उशिरा वांद्रे पोलिसांत हजर करण्यात आलं, तिथे त्याला अटक करण्यात आली. आज त्याला कोर्टात हजर करुन पुढील कारवाई केली जाईल. लॉकडाऊनदरम्यान मजुरांची दिशाभूल करुन गर्दी जमवल्याचा आरोप विनय दुबेवर आहे.


विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. विनय दुबेचा मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी दांडगा जनसंपर्क आहे.

Lockdown | वांद्रे गर्दी प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा

विनय दुबेने 'चलो घर की ओर' मोहीम सुरु केली होती. त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये हे आवाहन केलं होतं. यासंदर्भात त्याने ट्वीटही केलं होतं. स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत ट्रेनची सोय केली नाही तर देशव्यापी आंदोलन केलं जाईल, असा इशारा त्याने दिला होता.

Lockdown | वांद्रेतील गर्दी पूर्वनियोजित होती का? गर्दी करणारे तरुण काय म्हणतात ऐका!