मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊन-2 च्या घोषणेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजन करत आहे, याची माहिती उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली. राज्यातील उद्योगधंदे सुरु करण्याबाबत 20 एप्रिलनंतर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वैद्यकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची माहिती असणाऱ्यांनी पुढे यावं असं आवाहन केले होतं, याला जवळपास 21 हजार जणांनी प्रतिसाद दिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.


परराज्यातील नागरिकांना, मजुरांनाही मुख्यमंत्र्यांनी मोठ्या आपुलकीने आवाहन केले आहे. तुम्ही घाबरू नका, आमच्यासोबत राहा. तुम्ही महाराष्ट्रात आहात चिंता करु नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण एकजुटीने कोरोनाच्या संकटाशी सामना करु. आजपासून परराज्यात जाणाऱ्या ट्रेन सुरु होतील, असं या मजुरांना वाटलं होतं. त्यामुळे हे सर्वजण वांद्रे स्टेशनबाहेर जमले होते. राज्य सरकार तुमची काळजी घेतंय. या गोरगरीब जनतेच्या भावनांशी खेळू नका आणि राजकारण करु नका. या संकटाचा कुणी गैरफायदा घेतला तर त्यांना सोडणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला.


कोरोनानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी टीम करण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार या टीमचं नेतृत्व करत आहेत. राज्यातील आर्थिक बाबींचा ही टीम अभ्यास करणार आहे. राज्यातील उद्योगधंदे सुरु करता येतील का याचा अभ्यास सुरु आहे. याबाबत येत्या 20 एप्रिलनंतर निर्णय घेऊ. याशिवाय विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींना एकत्र आणून त्यांना या कोरोनाच्या लढाईत एकत्र येण्याचं आवाहन केलं जात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.


कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आज एकत्र आहेत. मी सर्व नेत्यांशी बोलत आहे. अनेक मौलवींशी बोलत आहे. आज आपण एकजूट दाखवली पाहिजे. या एकजुटीच्या जोरावर आपण हे युद्ध जिंकू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.




संबंधित बातम्या :

मुंबईत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी

Coronavirus | भारताच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचलावा : मोदी