विरारमधील नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवं वळण
एबीपी माझा वेब टीम | 14 Mar 2017 09:21 PM (IST)
विरार: 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाला विरारमध्ये झालेल्या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. विरारच्या शुभ-लाभ इमारतीत राहणाऱ्या संपदा सांबरेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी संपदाचा पती सागरविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटकही केली. मात्र संपदाची हत्या झाली नसून तिनं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते आहे. कारण घटनेच्या वेळी दरवाजाची कडी आतून लावली होती अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. तसंच घटनेपूर्वी आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज संपदानं दोन मित्रांना पाठवला होता. आणि सोसायटीमधल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार सागर घटनेच्यावेळी बाहेर होता असं समजतं आहे. मात्र, केवळ संपदाच्या माहरेच्यांच्या दबावापोटी सागर सांबरेला पोलिसांनी अटक केल्याचा आरोप होतो आहे. संबंधित बातम्या: विरारमध्ये नवविवाहितेचा जळून मृत्यू, पती पोलिसांच्या ताब्यात