शिवसेनेला आताच उपरती का? तावडेंचा सवाल
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2017 04:00 PM (IST)
मुंबई: शिवसेनेसोबतच्या युतीसाठी आम्ही पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहोत. पहिली बैठक झाली, दुसरी झाली तेव्हा मंत्र्यांवर आक्षेप नव्हते, मग आजच शिवसेनेला का उपरती झाली, असा सवाल शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते. भाजपने युतीसाठी पारदर्शकता हा मुद्दा शिवसेनेपुढे ठेवला आहे. मात्र भाजप नेते शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेने तावडे, प्रकाश मेहता आणि आशिष शेलार यांच्यावर अनेक आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्या पारदर्शकतेपासून सुरुवात करावी, असा पवित्रा घेतला. याबाबत विनोद तावडे म्हणाले, "यापूर्वी युतीबाबत दोन बैठका झाल्या, त्यावेळा त्यांना आक्षेप नव्हता, मग आताच उपरती का झाली?" याशिवाय "युतीसाठी भाजपकडून मी, प्रकाशभाई, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार होतो. आम्हाला वाटलं शिवसेनेकडून सुभाष देसाई असे ज्येष्ठ मंत्री येतील. पण यांनी विभागप्रमुख, माजी आमदार असे ज्युनिअर लोक पाठवले. मात्र तरीही आम्ही काही बोललो नाही, त्यांच्याशी चर्चा केली", असं तावडे म्हणाले. आज युतीबाबत यादी देणार होतो, बैठक होणार होती, शिवसेना नाही बोलली हे मला प्रसारमाध्यमातून कळलं. मी अनिल देसाईंना फोन लावला तेव्हा त्यांनी याबाबत सांगितलं, असं तावडे म्हणाले. अनिल देसाईंनी मी फोन करुन विचारल्यावर सांगण्याऐवजी बैठकीत सांगणं आवश्यक होतं. युतीची चर्चा अशी प्रसारमाध्यमातून होत नाही, असं तावडेंनी नमूद केलं. पंतप्रधानांबाबत शिवसेनेने 'चुनावी जुमला' अशी टीका केल्यानंतर किरीट सोमय्यांनी टीका केल्याचं तावडे म्हणाले. सामनातून भाजपच्या कोणत्याही नेत्यावर टीका केली नाही, असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले होते. त्याबाबत तावडे म्हणाले, " आम्हीही शिवसेनेच्या नेत्यांवर नाही, तर कंत्राटदारांवर टीका केली, मग तुम्हाला ते का लागलं? संबंधित बातम्या