मुंबई : केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही मराठी भाषेला आपल्याच राज्यात हाल सोसावे लागत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास परप्रांतीय व्यक्तींकडून नकार दिला जातोय. वरती हिंदी किंवा इतर भाषांमध्ये बोलण्यासाठी अरेरावीपणा केला जातो. याचा प्रत्यय आता वर्सोव्यातही आला आहे. मी मराठीत बोलणार नाही, हिंदीतच बोलणार. तुला काय करायचं ते कर असं डी मार्टच्या कर्मचाऱ्याने म्हटलं. पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटकवल्यानंतर मात्र त्यांचा माज उतरला.
मुंबईतील एअरटेल गॅलरीतील एका हिंदी तरुणीने या आधी माज दाखवला होता. त्यानंतर आता मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील डी मार्ट मधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये देखील मराठीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. डी मार्ट कर्मचाऱ्याकडून ग्राहकाला मी मराठी बोलणार नाही, हिंदीतच बोलणार असे म्हटल्याने वाद झाला. तसेच तुला काय करायचं ते कर असंही त्या मराठी व्यक्तीला अरेरावीपणे म्हटलं गेलं.
त्याचा व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर वर्सोव्याचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी डी मार्टमध्ये जाऊन त्या तरुणाला चांगलाच धडा शिकवला.
सुरुवातीला मनसेचे कार्यकर्त्यांनी त्या हिंदी कर्मचाऱ्यांना सरळ भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही ते कर्मचारी माफी मागत नव्हते. नंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फटकवल्यानंतर मात्र त्यांनी माफी मागितली. या पुढे मराठी माणसाचा भाषेवरून अपमान करणार नाही, जी गोष्ट घडली त्याबद्दल माफी मागतो असं ते हिंदी कर्मचारी म्हणाले.
एअरटेल गॅलरीतील हिंदी तरुणीचा माज
काही दिवसांपूर्वी चारकोपमधील एअरटेल गॅलरीमध्येही असाच प्रकार घडला होता. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी कशाला बोललं पाहिजे असं म्हणत एका हिंदी कर्मचाऱ्याने ग्राहकाशी हुज्जत घातली. 'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ है. हम हिंदुस्थान मैं रहते है', भारतात कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो, असे एक तरुणी मराठी तरुणाला म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एअरटेलच्या गॅलरीत तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने मराठी बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तेथील तरुणीने मराठी बोलण्यास नकार देत हुज्जत घातली.
आपल्याच घरात हाल सोसते मराठी
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी भाषेवरून वाद होताना दिसत आहे. मराठी माणसांना हिंदीत किंवा मारवाडी, गुजराती किंवा इतर भाषांमध्ये बोलण्याची जबरदस्ती करण्याचे प्रमाण वाढतच आहे. हजारो किलोमीटरवरुन मुंबईत कामाला यायचे आणि इथे आल्यानंतर मराठी भाषेचा अपमान करायचा याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यासंबंदी विशेषतः काही हिंदी भाषकांची मुजोरी अधिकच वाढताना दिसत आहे. त्यामुळे 'आपल्याच घरात हाल सोसते मराठी' अशी काहीशी अवस्था मराठी भाषेची आणि मराठी माणसाची झाल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा: