मुंबई: कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांची याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. याप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करताना चुकीचे आरोप लावले असल्याचा दावा करत हा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका मिलिंद एकबोटेंनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.


न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला यांच्या खंडपीठानं मात्र यावर सुनावणी घेण्यास नकार देत, दुस-या खंडपीठापुढे जाण्याचे आदेश एकबोटे यांना दिले आहेत. त्यामुळे एकबोटे यांना आता दुस-या खंडपीठापुढे आपली याचिका सादर करावी लागणार आहे.

१ जानेवारीला कोरेगाव भीमा इथं शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या लोकांवर सणसवाडी इथं दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरूजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्याविरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.

ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तिथं नव्हतो, तसेच आपल्या झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे.

एकबोटे यांचा जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने २२ जानेवारीला फेटाळलाय. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी ६ फेब्रुवारीला होणार आहे.