शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. आणि लाभार्थी शेतकऱ्यांची आकडेवारी विधानसभेत जाहीर करा अशी मागणीही त्यांनी केली. भाजप कालच जाहीर केलेल्या मिशन 350 वरही उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलंय.
शिवसेनेत कुठलेच मतभेद नाही, कुठलाच अंतर्गत वाद नाही, तुम्ही जे रंगवलं त्याच्यावर कालच पडदा पडला, असं सांगत हाजी अराफत शेख यांच्या स्फोटक आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप आपला नंबर 1 चा शत्रू आहे. त्यांनी 2019 साठी तयारी सुरु केली आहे. आता आपल्यालाही रस्त्यावर उतरून तयारी करावी लागेल. त्यामुळे आता आपापसातील हेवेदावे बंद करा आणि कामाला लागा, असा आदेशच उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे.
कर्जमाफीबद्दल शिवसेना आक्रमक
सरकारनं जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी पूर्णपणे झाली नाही. 10 लाख शेतकऱ्यांचे अर्ज वैध ठरले अशी आकडेवारी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची लोकसंख्या लक्षात घ्यावी अन्यथा लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना कर्जमाफी व्हायची शक्यता टाळता येत नाही असं उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
राज्यात 79 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. ते आकडे आम्हाला सभागृहात पाहिजेत, 40 लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार, तेही आम्हाला सभागृहात पाहिजे. ते आम्ही विभागवार तपासणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
याची जबाबदारी विभागवार पुढील नेत्यांवर देण्यात आली आहे.
पूर्ण विदर्भाची जबाबदारी दिवाकर रावते
उत्तर महाराष्ट्र - संजय राऊत
मराठवाडा - रामदास कदम
ठाणे-कोकण - सुभाष देसाई
पश्चिम महाराष्ट्र - गजानन किर्तीकर