मुंबई : पनवती लोकांकडून पेंग्विनबाबत टीका होत आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसेला लगावला आहे.


मुंबईतील राणी बागेत  दक्षिण कोरियाहून आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एकाचा काल मृत्यू झाला. यानंतर मनसेसह काँग्रेसने युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

"ये तो होना ही था," या मथळ्याखाली मनसेने पत्रक काढून आदित्य ठाकरेंवर टीका केली. तसंच बालहट्टापायी मुंबईकरांच्या 25 कोटी रुपयांचा चुराडा केला. उरलेल्या पेंग्विना थंड प्रदेशात परत पाठवावे, असा सल्लाही मनसेने दिला.


राणीच्या बागेतील एका मादी पेंग्विनचा जिवाणू संसर्गामुळे मृत्यू


या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "या पेंग्विनचा मृत्यू वातावरण बदलामुळे झालेला नाही. पण आरोपमाफियांना हे कळत नाही. जे पेंग्विन राणी बागेत आणले आहेत, ते या वातावरणात तग धरु शकतात.

"जे पक्ष उरलेल्या पेंग्विनला वाचवण्यासाठी त्यांना परत पाठवण्याची मागणी करत आहेत, त्यांनी स्वत:चा पक्ष आधी वाचवावा. पेंग्वीन वाचवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत," असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावलं.

बालहट्टामुळे एका पेंग्विनचा मृत्यू, नितेश राणेंचा निशाणा


बालहट्टामुळे एका पेंग्विनचा मृत्यू, असा घणाघात काँग्रेसचे आमदार नितेश राणे ट्वीटच्या माध्यमातून केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी आदित्य यांच्या संकल्पनेतील ओपन आर्ट गॅलरीचं कौतुक केलं. ओपन आर्ट गॅलरीसारखी एवढी चांगली संकल्पनाही कदाचित बालहट्टामुळेच झाली," असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली.