मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजपचा कारभार, सत्तेत मित्रपक्षांना दिली जाणारी वागणूक याबाबत सविस्तर भाष्य केलं. भाजप मुस्कटदाबी करत असल्याचा आरोपही उद्धव यांनी केला.


लाचारी पत्करणं शिवसेनेच्या स्वभावात नाही. समविचारी पक्ष म्हणून आम्ही 25 वर्ष युतीत राहिलो. मात्र आमची फसवणूक झाली, असा दावाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. मध्यावधी निवडणुका झाल्याच तर केंद्रात आणि राज्यात परिवर्तन होईल, असे संकेत त्यांनी दिले.

युती खरं तर विधानसभा निवडणुकीच्या वेळीच तुटली होती. तेव्हा त्यांनी चर्चेचं गुऱ्हाळ घालून हा डाव साधला होता, पण शिवसेनासुद्धा लेचीपेची नाही हे त्यांना दाखवून दिलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'देशात लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. मोदींचं वारं होतं. सत्ता हाताशी होती. तेव्हा नोटाबंदीही नव्हती. शिवसेनेला 10-15 जागा मिळाल्या तरी बस, अशी त्यांच्या दिल्लीच्या वर्तुळात चर्चा होती. आम्ही 63 जागा जिंकल्या. 20 जागा थोडक्यात गेल्या.' असा दावा उद्धव यांनी केला.

'मी विचार असा केला की, युती तुटली, त्यांनी तोडली हे जरी खरे असले तरी काँग्रेस आपल्या राज्यातून जातेय हेसुद्धा सत्य होतं. मग केवळ आणि केवळ काँग्रेस नको या लोकांच्या भावनेचा आदर ठेवून मी पुन्हा युती करण्याचा प्रयत्न केला. आता त्यानंतरही त्यांना कुठेच युती नकोशी असेल तर मग मात्र भावनेतून बाहेर पडून काही पावलं उचलावीच लागली.' अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या.