मुंबई : 24 तासानंतर पावसानं मुंबईतून एक्झिट घेतल्यानं तुम्ही-आम्ही सुटकेचा श्वास सोडला, पण काल मुंबईवर एक भयानक संकट घोंघावत होतं. ज्याची आपल्याला कल्पनाही केलेली नव्हती.


काल (मंगळवार) दुपारच्या सुमारास मुंबईच्या डोक्यावर तब्बल 9 किलोमीटर उंचीचा ढग होता. जो फुटला असता तर मुंबईची परिस्थिती आणखी बिकट झाली असती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी आज (बुधवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही धक्कादाय माहिती उघड केली.

'मनपाच्या कामामुळे मुंबई दुसऱ्याच दिवशी पूर्वपदावर'

दुसरीकडे मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसावर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेची पाठ थोपटली. मनपाच्या कामांमुळे दुसऱ्याच दिवशी मुंबई पूर्वपदावर आली. असा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. बेस्ट आणि पालिका कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सजगतेबाबतही उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानले. याचवेळी उद्धव ठाकरेंनी टीकाकारांनाही उत्तर दिलं. ‘टीका करणारा खरा मुंबईकर नाही. असा टोला त्यांनी हाणला. काल मुंबईच्या डोक्यावर 9 किमी उंचीचा मोठा ढग होता. सुदैवानं तो फुटला नाही. नाहीतर परिस्थिती आणखी बिकट झाली असती. अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.

‘उद्यापासून मुंबईत आरोग्य शिबीरं सुरु करणार’

दरम्यान, पावसानंतर रोगराई पसरु नये यासाठी तात्काळ साफसफाईचे देखील आदेश देण्यात आले आहेत. तसेच उद्यापासून (गुरुवार) संपूर्ण मुंबईत पालिकेच्या वतीनं आरोग्य शिबीरं सुरु करण्यात येणार आहेत. तसेच रविवारपासून या शिबीरांची संख्याही वाढवण्यात येणार असल्याची माहितीही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

‘नालेसफाई झाली नसल्याचा आरोप खोटा’

दुसरीकडे नालेसफाईवरुन शिवसेनेवर सध्या टीका करण्यात येत आहे. मात्र, हे आरोप उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावले आहेत. नालेसफाई झाली नाही हा आरोप खोटा असल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
‘महापौर, आमदार आणि शिवसैनिकांनी मदत केली’

मुंबईत पाणी तुंबल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांसोबत महापौर, आमदार आणि शिवसैनिक मदतीसाठी पुढे सरसावले असंही उद्धव ठाकरेंनी आवर्जून सांगितलं.

भाजपवर निशाणा

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी गोरखपूर बालमृत्यू प्रकरणावरुन भाजपवर निशाणा साधला. 'गोरखपूरमधील बालमृत्यू म्हणजे हत्याकांडच आहे. पण पावसाच्या बातमीत ही बातमी वाहून गेली.' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

दुसऱ्या दिवशीच मुंबई पूर्वपदावर : उद्धव ठाकरे

पालिकेच्या वतीनं उद्यापासून हेल्थ कॅम्प सुरु करणार : उद्धव ठाकरे

रोगराई येऊ नये यासाठी तात्काळ साफसफाईचे आदेश : उद्धव ठाकरे

महापालिकेनं काल चांगलं काम केलं : उद्धव ठाकरे

नालेसफाई झाली नाही हा आरोप खोटा : उद्धव ठाकरे

महापौर, आमदार सर्वांनी पाण्यात उतरुन मदत केली : उद्धव ठाकरे

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सोबतीनं शिवसैनिकांनीही मुंबईकरांना मदत केली : उद्धव ठाकरे

तुंबलेलं पाणी काढलं गेलं नसतं तर मुंबईची काय अवस्था झाली असती? : उद्धव ठाकरे

आपण एका मर्यादेपर्यंतच निर्सगाचा सामना करु शकतो : उद्धव ठाकरे

काल मुंबईच्या डोक्यावर 9 किमीचा ढग होता, सुदैवानं ढगफुटी झाली नाही, नाहीतर परिस्थिती आणखी बिकट झाली असती : उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या :

मुंबईत पावसाची उघडझाप सुरुच, लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

LIVE : मुंबईचा पाऊस; रस्ते, रेल्वे ट्रॅफिक अपडेट्स

महापौर म्हणतात, मुंबईच्या अवस्थेला एकटी महापालिका जबाबदार नाही!

26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य?

26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य?

मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामध्ये सहा जणांचा मृत्यू

मुंबईच्या पावसाचे 3 बळी, विक्रोळीत 2 घरं कोसळून तिघांचा मृत्यू