मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील संबंधामध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण आजच्या (सोमवार) स्टार्ट अप आणि उद्योग रतन पुरस्कार सोहळ्यालाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाठ फिरवली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. मात्र नियोजित कार्यक्रमाला आमंत्रण असूनही उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाही. त्यामुळे आता दोन्ही पक्षातील संबंध टोकाला गेल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला का उपस्थित राहू शकले नाही याबाबत मात्र नेमकी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

दुसरीकडे काल (रविवार) झालेल्या नवी मुंबई विमानतळाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावरही शिवसेनेनं बहिष्कार टाकला होता. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याचा आरोप करत विमानतळ भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेनं बहिष्कार टाकला होता.