ओव्हरलोड वाहतुकीविरोधातील आंदोलनाला उदयनराजेंचा पाठिंबा
एबीपी माझा वेब टीम | 30 May 2018 09:41 PM (IST)
मराठा कामगार सेना 4 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहे. ‘ओव्हरलोड विरोधात आता आरपारची लढाई’ असे म्हणत मराठी कामगार सेनेने या उपोषणाची घोषणा केली आहे.
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : ओव्हरलोड वाहतुकीमुळे दररोज कुठे-ना-कुठे अपघाताची घटना घडते आणि त्यात अनेकदा जीवितहानीही होते. यामुळे मराठी कामगार सेनेने ओव्हरलोड वाहतुकीला विरोध करत लढा उभारला आहे. या लढल्याला खासदार उदयनराजे यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळालं आहे. मराठा कामगार सेना 4 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहे. ‘ओव्हरलोड विरोधात आता आरपारची लढाई’ असे म्हणत मराठी कामगार सेनेने या उपोषणाची घोषणा केली आहे. मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी यासंदर्भात माहिती दिली. ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न नेमका काय आहे? ओव्हरलोड वाहतुकीमुळे दिवसागणिक अपघात होतात, त्यात बळी जातात, तसेच अपघातामुळे वाहतूकही मंदावते. रस्ते खराब होतात. असंख्य समस्य असातानाही ओव्हरलोड वाहतुकीला आळा घातला जात नाही, अशी मराठी कामगार सेनेची तक्रार आहे. ओव्हरलोड वाहतूक दलाल आणि आर टी ओ मधील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास सुरु आहे. हजारो कोटींचा शासनाचा महसूल हे भ्रष्ट आरटीओ अधिकारी दिवसाला बुडवतात. प्रत्येक ओव्हरलोड गाडीमागे या आरटीओमधील अधिकाऱ्यांचा हफ्ता बांधला गेला आहे, असा आरोप मराठी कामगार सेनेचा आहे.