मुंबई : महाराष्ट्राला एक एक रुपयांचा हिशोब दिला जाईल, असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. दावोसला जे शिष्टमंडळ गेलंय ते स्वत:च्या खर्चानं गेलं आहे. सध्या अनेक आरोप केले जातायत, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हा दौरा ऐतिहासिक दौरा ठरणार असल्याचं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं. दावोसचा दौऱ्यावर आदित्य ठाकरेंनी टिका करत या दौऱ्याचा हिशोब द्यावा असं म्हटलं होतं. त्यावर उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलंय. 


दावोसला जिथे 5-6  लोकांचे काम आहे.  तिथे एवढे लोक का घेऊन जाताय? बॅग उचलायला असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देत उदय सामंतांनी म्हटलं की, जे कधीही स्वत:च्या खर्चाने गेले नसतील त्यांना या गोष्टीचं अप्रुप वाटणारचं. पण या सगळ्याचा हिशोब दौरा झाल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला दिला जाईल. 


उदय सामंतांनी काय म्हटलं?


मी या पत्रकार परिषदेच्या माध्यामातून मी महाराष्ट्राच्या जनतेला शब्द देतो की 19 तारखेला आल्यानंतर पुढच्या दोन दिवसांमध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयाचा हिशोब दिला जाईल. हा हिशोब पुराव्यानिशी दिला जाईल. आजचे आकडे जे आहेत, त्याकडे आपण मनोरंजन म्हणून पाहावं. त्यांच्या काळात चांगले एमओव्यू झाले नाहीत आणि आमच्या काळात ते होतायत. हा मुख्यमंत्र्यांचा दौरा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक होणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं. 


त्यांनी आम्हाला शिकवू नये - उदय सामंत 


 जो वेदांता फोक्सकॉन आम्ही कधी घालवला नव्हता तो घालवल्याचा आरोप आमच्यावर केला जातोय. इतरही काही आरोप झाले. पण याच्या पलिकडे जाऊन महाराष्ट्राची बाहेरुन उद्योजक आणण्याची ताकद किती आहे, हे यावरुन सिद्ध होईल. तसेच ज्यांनी पोलिसांच्या हातून महाराष्ट्राच्या उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले त्यांनी किती लोकांचं शिष्टमंडळ घेऊन जावं याचं मार्गदर्शन करु नये. यामधील बरचंसं शिष्टमंडळ हे स्वत:च्या खर्चाने तिकडे गेलं आहे. ज्यांनी कधीही स्वत:च्या खिशातून पैसे काढले नाही,त्यांना हे अप्रुप असू शकतं. त्यामुळे जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी काही जण स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करत असतील त्यामागे काहीही गैर नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं. 


आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं?


असंवैधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दावोसला जवळजवळ 50 लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. मागचा दौरा त्यांनी केला तेव्हा 28 तासात 40 कोटी रुपये खर्च केले होते.  आधी 50 खोके होते आता हे 50  लोकं घेऊन जात आहे  असं म्हणत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे. ते मुंबईत (Mumbai News) पत्रकार परिषदेत बोलत होते. वऱ्हाड निघाले लंडनला तसं हे वऱ्हाड निघाले दाओसला असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 


दाओसला तीन ते चार दलाल मित्र आहेत त्यांना सुद्धा सोबत घेऊन जाता आहेत. मुख्यमंत्री बायोकाला घेऊन जाऊ शकतात.  येथे मुलांना सुद्धा घेऊन जाता आहे.सही मुख्यमंत्री करणार आहेत मग एवढ्या लोकांची गरज आहे का? महाराष्ट्र सरकारचा पैसा यामध्ये जातोय म्हणजे आपला सगळ्यांचे पैसे जात आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.  


हेही वाचा : 


आधी 50 खोके होते आता 50  लोकं, वऱ्हाड निघालंय दावोसला; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका