मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव काठोकाठ भरला आहे. तुलसी तलावात 97.20% पाणीसाठा जमा झाला आहे. तुळसी तलाव भरण्यासाठी केवळ 6 इंच पाणीसाठा वाढ‌णे बाकी आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता काहीशी कमी झाली आहे.


तुळशी तलावाची पाणी भरण्याची एकूण क्षमता 139.17 मीटर एवढी असून आज 139.01 मीटर एवढी पातळी पाण्याने गाठली. त्यामुळे तुळशी तलाव क्षेत्रात जर असाच पाऊस पडत राहिला, तर येत्या दोन दिवसांत हा तलाव पूर्ण भरेल. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरण्याचा श्री गणेशा या तलावापासून होत असतो. मागील वर्षी 9 जुलै रोजीच हा तलाव भरला होता.

मुंबईला भातसा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळशी आदी तलावांमधून दरदिवशी 3750 दशलक्ष अर्थात 375 कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा होतो. भातसा तलावातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो. तर तुळशी आणि विहार या दोन तलावांमधून सर्वात कमी पाण्याचा पुरवठा होतो.

आतापर्यंत सर्व तलावांमध्ये 38 टक्के एवढा पाण्याचा साठा जमा झाला आहे. आत्तापर्यंत सर्व तलावांमध्ये मिळून 5 लाख 47 हजार दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.