नवी मुंबई : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबईत घडली. दुर्दैवं म्हणजे मुलीच्या वाढदिवशीच या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. आपल्या मुलीला जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यापूर्वीच वाहतूक पोलिसाला जीव गमवावा लागला.


अतुल घागरे हे तळोजा एमआयडीसीमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पहाटे पाचच्या सुमारास गेले होते. यावेळी त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी अनेकवेळा वाहतूक कोंडी होत असल्याने पोलीस संख्याबळ वाढवा अशी विनंती कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. मात्र याकडे वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष केल्यानेच अतुल घागरे यांना जीव गमवावा लागला, असा संतापाचा सूर पोलीस कर्मचाऱ्यांमधून निघत आहे.

या भागात रात्रीच्या वेळी फक्त एकच वाहतूक पोलीस कर्मचारी असल्याचं समोर येत आहे. यामुळे पोलीस खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अतुल घागरे यांच्या पत्नी रबाळे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.