मुंबई : मुली पळवण्याच्या वादग्रस्त विधानाबाबत भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टर लावले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर आणि घाटकोपर इथे पोस्टर लावून निषेध व्यक्त केला आहे. राम कदम यांना रावणाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. तसंच राम कदम यांच्या भव्य रक्षाबंधन सोहळ्याची खिल्ली उडवत त्यांचं व्यंगचित्र काढण्यात आल आहे.


मनसेचे घाटकोपरमधील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी हे बॅनर लावले आहेत. यात आता मनसेने मुख्यमंत्री आणि भाजप सरकारवरही निशाणा साधला आहे. घाटकोपरमधील बॅनर पोलिसांनी उतरवले असून एकाला ताब्यात घेतलं आहे. परंतु आज दिवसभर आमदार राम कदम यांच्याविरोधात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची आंदोलनं होणार आहेत. त्यामुळे आमदार राम कदम यांना दहीहंडी कार्यक्रमात केलेलं विधान महागात पडलं आहे.

पूर्वी म्हणायचे 'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर', आव्हाडांचा राम कदमांवर हल्लाबोल

वर्षा बंगल्याबाहेरील पोस्टर


वाह रे भाजप सरकार
वाह रे मुख्यमंत्री तुमचा आमदार
मतदारांनो आपल्या मुलींना सांभाळा, स्वयंसघोषित दयावान, डॅशिंग भाजप आमदार तुमच्या मुलींना पळवणार आहे. जर आमदार किंवा त्यांच्या बगलबच्च्यांनी असे केले तर पोलिसात तक्रार करा आणि आम्हालाही कळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी.

घाटकोपरमधील पोस्टर


वाह रे वाह भाजप तुमचे सरकार
महिलांचा मांडला तुम्ही इथे बाजार, माय भगिनींना पळवणार तुमचे आमदार
तुम्ही सांगा मुख्यमंत्रीसाहेब या मुली पळवण्याच्या कटात सामील आहे का भाजप सरकार?
तुम्हा राम म्हणून मुख्यमंत्रीसाहेब, स्वत:ला म्हणून घेत होता हनुमान
जगातल्या सगळ्या मोठ्या हंडीत या रावणाने
झुकवली तुमच्या आमदाराने आमच्या घाटकोपरची मान
गणेश चुक्कल

प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदमांनी गोविंदांना उतरवलं!

दहीहंडीच्या कार्यक्रात राम कदम नेमकं काय म्हणाले होते?
"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.



राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका
आमदार राम कदमांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे.

"भाजपाचे आमदार राम कदम यांनी काल दहीहंडीत मुक्ताफळे उधळली आहेत. लग्नासाठी मुलींना पळवून नेण्याची विधाने करणारे राम कदम हे कोणत्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत? इथून पुढे महाराष्ट्रात मुली पळवून नेण्याचे प्रकार झाले तर त्याचा पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल करण्यात यावा", अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर, असं करायला आमदार म्हणजे काही राजा नाही. आजचं राज्य हे लोकशाहीचं, कायद्याचं राज्य आहे. मुलीला पळवून आणण्याचं आमदारांचं वक्तव्य भीतीदायक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

"राम कदम यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगायला हवं. आपण काय करतोय, कुणासमोर बोलताय, उत्साहाच्या भरात काय बोलतोय याचं भान सत्ताधाऱ्यांना राहिलं नाही. आज महिलांची स्थिती बिकट आहे, त्या असुरक्षित आहेत. त्यात अशी वक्तव्य करुन राम कदमांना नक्की काय म्हणायचं आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं", असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.

"मुली पळवण्याचा प्रकार घडला, तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल व्हावा"

'माझा'चा महाराष्ट्राला शब्द!
राम कदम जोपर्यंत बेताल वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागत नाहीत, तोपर्यंत ते एबीपी माझाच्या चर्चेत दिसणार नाहीत, अशी भूमिका एबीपी माझाने घेतला आहे.



खेद व्यक्त, पण माफी नाहीच
"कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. अर्धवट 54 सेंकंदांचं विधान काही विरोधकांनी पसरवून संभ्रम निर्माण केला दुसऱ्या दिवशी! आदल्या दिवशी दुपारी मीडिया पत्रकार उपस्थित होते. त्यांनी आक्षेप घेतला नाही, कारण त्यांनी संपूर्ण संभाषण ऐकले होते", असं राम कदम यांनी ट्वीट केलं आहे.