मुंबई : साल 2013 मध्ये मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या शक्ती मिल सामुहिक बलात्कार (Shakti Mill Gang Rape) प्रकरणी मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) आज आपला अंतिम फैसला सुनावणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं 4 डिसेंबर 2014 रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात दिलेलं आव्हान कोर्टानं 3 जून 2019 मध्ये फेटाळून लावलं होतं. त्यानंतर ही शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवरील नियमित सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे पार पडली. या खंडपीठानं सर्व दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर राखून ठेवलेला आपला निकाल गुरूवारी सकाळी साडे 10 वाजता जाहीर करण्याचं निश्चित केलं आहे. राज्य सरकारनं या खटल्यासाठी अॅड. दिपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती.


 

शक्ती मिल बलात्कार प्रकरणी सुनावलेली फाशीची शिक्षा ही कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आहे. राज्य सरकारनं ही फाशी निश्चित करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. बलात्कार हा हत्येपेक्षा भयंकर गुन्हा आहे, कारण इथं केवळ पीडीतेच्या शरीरावरच नाही तर आत्म्यावर घाला होतो.

 

बलात्काराच्या मानसिक धक्यातून पीडीतेला सावरण्यास बराच मोठा कालावधी जातो. के.ई.एम. च्या नर्स अरूणा शानबाग यातर अखेरच्या श्वासापर्यंत यातून सावरूच शकल्या नाहीत. त्यामुळे बलात्कारांची वाढती संख्या आणि समाजात वाढत जाणारा रोष पाहता कायद्यातील नव्या सुधारणेनुसार शक्ती मिल बलात्कार प्रकरणी दिलेली फाशीची शिक्षा योग्यच असल्याचा दावा राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं हायकोर्टात केला गेला आहे.

 

मुंबईसह संपूर्ण देशाला हादरूवन टाकणाऱ्या शक्ती मिल गँगरेप प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या तिघांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने कलम 376(ई) या कायद्यात सुधारणा करत संबधित आरोपींनी दोन वेळा बलात्काराचा गुन्हा केल्यास त्याला जन्मठेपेची अथवा फाशीची शिक्षा ठोठावू शकतो अशी नव्यानं तरतूद केलेली आहे. 


 

काय आहे प्रकरण?

मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 रोजी संध्याकाळच्या वेळी एक महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर पाच नराधमांनी बलात्कार केला होता. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली. अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली तर सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तीन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.