मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर ऐरोली उड्डाण पुलाखाली भरधाव वेगात असलेल्या जीपने अचानक पेट घेतला. दरम्यान, जीपचा चालक आणि प्रवासी महिला प्रसंगावधान राखून वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला.


ऐरोली पुलाखाली गाडी येताच गाडीच्या इंजिनमधून आग येऊ लागली. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी ही गोष्ट गाडी चालकाच्या लक्षात आणून देत गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही क्षणाताच गाडीने भीषण पेट घेतला. पण त्याचवेली चालक आणि त्याच्या सोबत असलेल्या प्रवासी महिलेने गाडीतून उडी घेतली.

घटनास्थळी असलेल्या वाहतूक पोलिसांनी चारही बाजूची वाहतूक रोखली आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवानांनी ही आग अटोक्यात आणली. ही जीप मुंबईवरुन नवी मुंबईच्या दिशेनं निघाली होती. दरम्यान, गाडीला लागलेल्या आगीमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती.