मुंबई : क्रूज ड्रग्स प्रकरणी कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आरोपांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीने केलेले सर्व आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर छापे टाकण्यात आले आणि कारवाई नियमानुसार होती आणि सर्व आरोपींना चौकशीनंतरच अटक करण्यात आली.


NCB डीडीज ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, नियमानुसार NCB साक्षीदारांसह क्रूझवर पोहोचले होते. आतापर्यंत 9 स्वतंत्र साक्षीदार या खटल्यात सामील झाले आहेत. 2 ऑक्टोबरच्या छाप्यापूर्वी एनसीबी त्यांना ओळखतही नव्हती असं त्यांनी सांगितलं.


क्रुजवरील कारवाईत काही जणांना सोडल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. या आरोपांना उत्तर देताना एनसीबीने सांगितले की, चौकशी केल्यानंतर 6 जणांना सोडून देण्यात आले. तर 8 जणांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलावले जाऊ शकते. नंतर चौकशी आणि खुलाशांच्या आधारे आणखी 10 लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे.


एनसीबीने सांगितले की, आम्ही सार्वजनिक स्त्रोत आणि इंटेलिजेन्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करतो. 2 ऑक्टोबर रोजी, गुप्त माहितीच्या आधारावर आम्ही आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलवर छापा टाकला आणि 8 लोकांना पकडले. मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि 1 लाखांहून अधिक रोख रक्कम तेथून जप्त केली.


NCB च्या कारवाई दरम्यान स्वतंत्र सार्वजनिक साक्षीदार आवश्यकता असते. अशा परिस्थितीत आमच्याकडे साक्षीदारांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी वेळ नाही. या प्रकरणात 9 स्वतंत्र साक्षीदार आहेत. आम्ही त्यांना आधी ओळखत नव्हतो. एवढेच नाही तर एनसीबीने म्हटले आहे की ताब्यात घेतलेल्या किंवा अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीला वाईट वागणूक आम्ही दिली नाही.


नवाब मलिक यांनी काय आरोप केले? 


राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकऱणात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीनं 11 जणांना अटक केली होती. यातील तिघांना सोडून देण्यात आलं. यातील रिषभ सचदेवा भाजप युवामोर्चाचे नेते मोहित कम्बोज यांचे मेहुणे आहेत. यासोबत अमीर फर्निचरवाला, प्रतीक गाभा यांनाही सोडण्यात आलं आहे. क्रुझवरील पार्टीतून या लोकांना अटक करण्यात आलं होतं. एनसीबी कार्यालयात देखील या तिघांना आणण्यात आलं होतं. मग त्यांना सोडण्याचे आदेश कुणी दिले. आमची मागणी आहे की, NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खुलासा करावा करावा. क्रुझवरील छापेमारीचं हे प्रकरण प्लॅन करुन केलेलं असून बोगस आहे, असा आरोपही त्यांनी केला.