ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झाला असला तरी संपलेला नसल्याने प्रत्येकाने मास्क लावून सार्वजनिक ठिकाणी फिरणे बंधनकारक आहे. ती प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. मात्र या जबाबदारीचे भान नसलेल्या 1900 नागरिकांवर ठाणे महापालिकेने कारवाई केली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल केला आहे. या दंडाची एकूण रक्कम तब्बल साडे नऊ लाख रुपये आहे.


ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये तसेच बाजारात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिले होते. तसे अधिकार सहाय्यक आयुक्त आणि पोलिसांना देखील देण्यात आले आहेत. गेल्या तीन आठवड्यापासून या आदेशाची अंमबजावणी करताना तब्बल 1900 व्यक्तींविरूद्ध दंडात्मक करण्यात आली आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले. तर या व्यक्तींकडून 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल वसूल करण्यात आला आहे, असेही शर्मा म्हणाले. यापुढे देखील कारवाई सुरुच ठेवण्याच्या सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.


ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीमध्ये गेल्या 21 दिवसांत विना मास्क फिरणाऱ्या 1900 व्यक्तींविरूद्ध कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक विना मास्क व्यक्ती नौपाडा प्रभाग समिती आढळल्या असून, सर्वात कमी कारवाई वागळे प्रभाग समिती करण्यात आली असल्याचे महानगर पालिकेने सांगितले आहे.


विना मास्क फिरणाऱ्या व्यक्ती या स्वतः सोबत इतरांचा जीव देखील धोक्यात घालू शकतात म्हणून अश्या व्यक्तींवर महापालिका कारवाई करत आहे. जोपर्यंत लस नाही तोपर्यंत मास्क हाच एकमेव सुरक्षेचा मार्ग असल्याचे जागतिक स्तरावर सिध्द झालेले आहे. त्यामुळे जबाबदार नागरिक बनून मास्क घाला असे आवाहन एबीपी माझा देखील तुम्हाला करत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :