ठाणे: ठाण्यात रविवारी ज्योतिष परिषद पार पडली. या ज्योतिष परिषदेत 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या अनुशंगाने नेत्यांचे भवितव्य वर्तवण्यात आलं.  2019 मध्ये केंद्रात कुणाचं सरकार येणार? राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती-आघाडी होणार का? अशा अनेक प्रश्नांवर ज्योतिषांनी भविष्य वर्तवलं.


ठाण्यात ब्राह्मण सभा मंडळ येथे रविवारी दिवसभर ज्योतिष अधिवेशन पार पडलं. यावेळी ‘2019 च्या निवडणुका’ या सत्रात पुण्याचे सिद्धेशवर मारटकर यांनी अनेक राजकीय भाकीतं वर्तवली.

प्रश्न:  महाराष्ट्रातील सध्याचं असंतोषाचं वातावरण निवळून सर्व समाजघटकांचं समाधान होईल असं वातावरण कधी येईल?

उत्तर: ऑक्टोबरपर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र ऑक्टोबरनंतर ही परिस्थिती निवळली असेल. मार्चनंतर पूर्णपणे शांततेचं वातावरण पाहायला मिळेल.

2019 च्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे कशी असतील?
लोकसभेत भाजपला बहुमत मिळणं कठीण आहे. त्यामुळे भाजपकडून मित्रपक्षांना एकत्र घेऊनच सत्ता स्थापन केली जाईल. तर राज्यात विधानसभा निवडणूक जर लोकसभेसोबत झाली, तर भाजप पुन्हा एकदा राज्यात सत्तेत येईल, अन्यथा ऑक्टोबरमध्ये झाल्यास सत्ता बदल पाहायला मिळू शकतो.

2019 निवडणुकांसाठी काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी करुन एकत्र लढतील?
पुन्हा एकदा काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी होणार हे दिसत आहे. मोठ्या संख्येने त्यांच्या जागा येणार.

सत्तेत एकत्र असलेले भाजपा- शिवसेना निवडणुकांसाठी युती करतील?
लोकसभा निवडणुकीत भाकीत केलं तर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा युती करतील. मात्र विधानसभेवेळी ही युती टिकेला असं वाटत नाहीत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील?
मुख्यमंत्री फडणवीस हे पाच वर्षांचा कार्यकाळ सहज पूर्ण करतील. जर पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली तर त्यांना परत एकदा मुख्यमंत्री केलं जाईल. किंवा मग त्यांना केंद्रात पाठवून चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री केलं जाईल. त्यांची पत्रिका स्ट्राँग आहे.

निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्ता कुणाची असणार?
लोकसभा-विधानसभा एकत्र झाल्या, तर भाजपची सत्ता पुन्हा एकदा राज्यात येईल. पण जर ऑक्टोबरमध्ये निवडणूक झाली तर सत्ता बदल होऊन काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते.

फडणवीसांनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संधी कुणाला मिळू शकेल?
एकतर भाजपची सत्ता आल्यास चंद्रकांतदादा पाटील, अन्यथा काँग्रेसची सत्ता आल्यास अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होतील.

2019मध्ये देशाची सुत्रे नरेंद्र मोदींकडेच असतील की दुसरे कोणी पंतप्रधान असेल?
पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होणार यात कोणतेही दुमत नाही. कारण त्यांच्या पत्रिकेत तो योग आहे. फक्त बहुमत न येता त्यांना मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल.

देशाच्या राजकारणात राहुल गांधींचे स्थान काय असेल?
देशाच्या राजकारणात एक विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींचं नाव आहे. निवडणुकीतही काँग्रेसला एक मोठा पक्ष म्हणून प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा असेल. मात्र, त्यांचा पंतप्रधान होण्याचा योग यावेळी दिसत नाही.