उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौर मीना आयलानी यांनी अखेर सभागृहात राजीनामा सुपूर्द केला. आयलानी यांचा महापौरपदाचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपुष्टात आला. त्यानंतर टीम ओमी कलानीला महापौरपदासाठी भाजप आणि साई पक्षाकडून आश्वासन मिळूनही त्या दोन महिन्यांपासून राजीनामा देण्यासाठी टोलवाटोलवी करत होत्या. अखेर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर महासभेत महापौर मीना आयलानी यांनी आपला पदाचा राजीनामा आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे तब्बल एक तपानंतर पुन्हा कलानी कुटुंबाकडे महापौरपद येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत, माजी आमदार पप्पू कलानी यांचा मुलगा ओम कलानी यांनी टीम ओमी कलानी हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यांनी भाजपच्या तिकीटावर आपले उमेदवार निवडून आणले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम ओमी कलानी यांना महापौरपद देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात महापालिकेवर भाजपाची सत्ता आल्यानंतरही टीम ओमी कलानीने कुठल्याही पदावर दावा केला नव्हता. मात्र महापौर मीना आयलानी यांचा जुलै महिन्यात महापौरपदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर टीम ओमी कलानीने महापौरपदासाठी हालचाली सुरु केल्या.



मात्र टीम ओमी कलानीला महापौरपद मिळू नये यासाठी भाजप आणि कट्टर विरोधक साई पक्षाने राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केली होती. तसंच याबाबत नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर भाजपनेच पत्रकार परिषद घेत, मीना आयलानी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही दोन महिन्यांचा काळानंतरही टीम ओमी कलानीला महापौरपद देण्याला भाजपा आणि साई पक्षाचा विरोध कायम होता.



अखेर या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत, टीम ओमी कलानीला महापौरपदाचा शब्द दिल्याचं सांगत, महापौर मीना आयलानी यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी पार पडलेल्या महासभा संपताच महापौर मीना आयलानी यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी त्या भावूक होत सर्व नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळात सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात पुढील महापौरपदाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, पंचम कलानी यांची वर्णी महापौरपदावर लागणार असल्याचं निश्चित झालं आहे.