दक्षिण मुंबईत टॅक्सीचालकांचा बंद
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2016 07:41 AM (IST)
मुंबई: आधीच रखडलेलेल्या रेल्वेनं वैतागलेल्या मुंबईकरांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. दक्षिण मुंबईत टॅक्सी चालकांनी बंद पुकारला आहे. ओला, उबर यासारख्या टॅक्सीसेवांवर निर्बंध आणण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या बंदमध्ये वेगवेगळ्या टॅक्सीचालक संघटना सहभागी झाल्या आहेत. आझाद मैदानावर जवळपास एक हजार टॅक्सी चालकांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. लोकल कोलमडली दरम्यान, मुंबईत काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने तिन्ही मार्गावरच्या वाहतूक सध्या विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवर भांडुप ते विक्रोळी स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचल्यामुळे जलद मार्गावरची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली. मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात एकही लोकल न आल्यानं संतापलेले प्रवासी रेल्वे रुळावर ठाण मांडून बसले. लोकलच नसल्याने कल्याण, डोंबिवली आणि ठाणे स्थानकांवरही मोठी गर्दी झाली.