मुंबई : कॅन्सर या दुर्धर रोगावर गरिबातल्या गरिबाला इलाज करता यावा यासाठी टाटा ट्रस्ट मोठं पाऊल उचलणार आहे. आता झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातही टाटाची नवी रुग्णालयं सुरु होणार आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे कॅन्सरचं सर्वात प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध रुग्णालय समजलं जातं.


यासंदर्भात घोषणा करुन रतन टाटा यांनी रुग्णांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. या रुग्णालयांसाठी रतन टाटा यांनी केंद्र सरकारच्या मदतीसाठी एक हजार कोटी रुपये आणि इतर वस्तू देण्याचं आश्वासन दिलं आहे. कॅन्सरग्रस्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी टाटांचा प्रयत्न आहे. रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

आसाम, राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये बनणाऱ्या कॅन्सर रुग्णालयात टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा असतील. यामुळे या राज्यांमधील रुग्णांवर तिथेच उपचार होतील.

इलाजासाठी मुंबईत उपचार महाग
टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल 60 टक्के कॅन्सरग्रस्तांना मोफत उपचारांसह नि:शुल्क सल्लाही देतं. ज्या रुग्णांकडे उपचारांसाठी पैसे नसतात, ते बहुतांश मुंबईत उपचारांसाठी येतात. पण मुंबईसारख्या महागड्या शहरात येऊन उपचार घेणं सगळ्याच कॅन्सरग्रस्तांना शक्य नसतं. ही अडचण पाहून पाच राज्यांमध्ये टाटांनी नवी रुग्णालयं सुरु करण्याची घोषणा केली आहे.

1000 कोटी रुपये खर्च
कॅन्सर हॉस्पिटल सुरु करण्यासाठी रतन टाटा यांनी एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या पैशांमधून वैद्यकीय उपकरणं आणि इतर आवश्यक साधनं खरेदी केली जातील. डॉक्टर आणि नर्स स्टाफ टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून प्रशिक्षण घेतील.

आसाम सरकारसह या नव्या प्रोजेक्टसाठी करार केल्याची माहिती टाटा ट्रस्टने दिली आहे. आसाममधील गुवाहाटीमध्ये कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुरु होईल. हॉस्पिटलमध्ये किमोथेरेपी, सर्जिकल ऑन्कोलॉजीसह इतर सुविधाही असतील. पहिल्या तीन टप्प्यात या प्रोजेक्टसाठी 540 कोटी रुपये मिळतील.

जयपूरमध्येही हॉस्पिटल
जयपूर कॅन्सर हॉस्पिटलसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रांची आणि झारखंडमध्ये हॉस्पिटलसाठी टाटा ट्रस्टने 23.5 एकर जमीन घेतली आहे. उत्तर प्रदेशासाठी वाराणसीमध्ये इंडियन रेल्वे कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि संशोधन संस्था अपग्रेड केलं जाईल.

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टला 25 एकर जमीन कॅन्सर हॉस्पिटलसाठी दिली आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं की, मुंबईबाहेरही अन्य राज्यांमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उघडली तर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा होईल.