ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीत आपल्या जवानांना विसरु नका. असं आवाहन करायच्या आधीच ठाण्याच्या एका शाळेने सीमेवर तैनात जवानांसाठी दिवाळीचा फराळ आणि शुभेच्छापत्र पाठवली आहेत. या उपक्रमाला भांडुपच्या एका विकास साईविहार मंडळानेही साथ दिली. या सगळ्यांनी मिळून जम्मू-काश्मीरच्या सीमेवर तैनात जवानांसाठी दिवाळीचा सुमारे 300 किलो फराळ पाठवला आहे.


देशाच्या रक्षणासाठी सीमेवर दिवस-रात्र तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी ठाण्याच्या सरस्वती मंदिर ट्रस्टच्या प्राथमिक विभागाच्या कब बुलबुलच्या छोट्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. या मुलांना साथ मिळाली आहे ती, भांडुपच्या विकास मंडळ, साई विहार, भांडुप यांची. या सगळ्यांनी मिळून सुमारे दिवाळीचा 300 किलो घरी बनवलेला फराळ जमा केला आणि लवकरच तो आपल्या सैनिकांपर्यंत पोहोचेल.

या मुलांनी केवळ फराळच गोळा केला असं नाही. तर या भावी जवानांनी सैन्यातल्या जवानांसाठी अतिशय सुंदर शुभसंदेश आणि शुभेच्छापत्रही तयार केली आहेत. काही पत्रातल्या मुलांच्या भावना तर आपल्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहात नाहीत.

सीमेवर लढतांना आपले जवान शहीद झाले तर त्यावेळी भरभरून बोललं जातं.  पण कब बुलबुलच्या या मुलांमध्ये देशसेवा आणि भारतीय लष्कराच्या जवानांनप्रती आदरभाव निर्माण व्हावा यासाठीचा हा उपक्रम फारच स्तुत्य आहे.